दिशा खातू वसईतील धर्मगुरूंनी समाजसेवा करताना लोकांना साहित्याची गोडी लावली. रेव्ह. फादर मिरांडा यांनी खऱ्या अर्थाने वसईतील साहित्य पर्वाला सुरुवात केली. सुरुवातीला भक्ती वाङ्मयाची निर्मिती केली आणि नंतर हळूहळू दर्जेदार साहित्यकृती तयार होऊ लागल्या. त्यातूनच वसईतून जगभरात पोहोचलेल्या ‘सुवार्ता’ मासिकाचा जन्म झाला. ख्रिस्ती मराठी साहित्य पर्व- भाग २ साहित्य हे माणसाला त्याच्या माणुसकीशी जोडते, जीवनातील प्रत्येक पैलू उलगडते. साहित्य माणसाच्या विचारांना योग्य दिशा देते, ज्यामुळे माणूस स्वत:ची मते बनवतो, नव्या कल्पनांना जन्म देतो. साहित्याला समाजाचा आरसा म्हटले जाते तर त्याच आरशात पाहून समाज प्रगल्भ होतो. वसईत खऱ्या अर्थाने रेव्ह. फादर मिरांडा यांनी साहित्य पर्वाला सुरुवात केली. फादर मिरांडा हे फक्त धर्मोपदेशक नसून ते समाजसुधारकही होते. चर्चसाठी उभारलेल्या निधीतून त्यांनी आर्चबिशप रॉबर्ट यांच्या ‘चर्च तिथे शाळा’ या धोरणानुसार जागोजागी शाळा उभारल्या. त्यांनी प्रत्येक स्तरातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ते स्वत: अनेक ठिकाणी जाऊन शिकवत असत. त्याकाळी त्यांनी दारूबंदीवर प्रभावी मोहीम राबवली होती. शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी परस्पर साहाय्यक संघाची स्थापना केली होती. फादर जे. एस. मिरांडा यांनी ‘शोध आणि बोध’ या मासिकानंतर ‘शांतिदूत’ हे पाक्षिक काढण्यास सुरुवात केली. त्या वेळी ते लेखक, मुद्रितशोधक, संपादक, व्यवस्थापक आणि वितरक इत्यादी भूमिका पार पाडत होते. त्यांच्या वाङ्मयोत्तेजक उपक्रमातून त्यांनी लोकांना वाचनाची गोडी लावली, अनेक लोकांना लिहिते केले आणि ६ जून १९५४ रोजी ‘कॅथलिक वाङ्मय मंडळा’ची स्थापना केली. या दरम्यान त्यांच्या साहित्यनिर्मितीच्या प्रेरणेतून अनेक भक्तिवाङ्मयातील पुस्तके प्रकाशित झाली. त्यामध्ये अनोक्लेत रमेडियस यांनी संपादित केलेले ‘आत्म्याची पेटी’ या रोमन लिपीतील पुस्तकाचा समावेश होता. जे पुढे जाऊन प्राध्यापक थॉमस काव्र्हालो यांनी मराठीत आणले, तसेच बिशप अॅण्ड्रय़ू डिसोजा यांनी ‘स्वर्गाची वाट’ हे पुस्तक संपादित केले तर फादर अँथनी कोलासो यांनी ‘स्वर्गाची किल्ले’ हे प्रार्थनेचे पुस्तक तयार केले. फादर मिरांडा यांच्या प्रोत्साहनामुळे सॅबेस्टियन यांनी संत चरित्रे लिहिली तर, फादर डॉमनिक आब्रियो यांनी ‘येशूची हाक’, ‘रिच्युअल संस्कार’, ‘दीक्षाविधी व नवी उपासनापद्धती’ इत्यादी पुस्तके लिहिली. प्राचीन स्त्री संत पर्पेतुआ आणि आग्रेस यांचे थोडक्यात चरित्र सांगणारे ‘दोन प्राचीन स्त्रीरत्न’ हे पुस्तक अगॉस्तीन फर्नाडिस यांनी लिहिले. फादर जे. एस. मिरांडा यांनी ‘शांतिदूत’ मासिकातून वसईतील सामाजिक प्रश्न मांडले, ज्यामुळे लोक जागृत होऊन संघटित होऊ लागले. त्यांनी हे मासिक स्वखर्चातून वर्षभर चालवले. पुढे ते बंद पडले आणि ‘सुवार्ता’ या आजही सुप्रसिद्ध असलेल्या मासिकाचा जन्म झाला. वसईच्या साहित्यविश्वातील आणि मराठी-ख्रिस्ती साहित्याच्या इतिहासातील ‘सुवार्ता’ हे सुवर्णपान असल्याचे म्हटले जाते. १८४२ पासून पुढच्या दीडशे वर्षांमध्ये महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय आलेख दाखवणारी साधारण शंभर ख्रिस्ती नियतकालिके, मासिके प्रकाशित झाली. त्यात ६ जून १९५४ साली प्रकाशित झालेले सुवार्ता हे वसई संस्कृती दाखवणारे आणि उच्च वाङ्मयीन दर्जाचे मासिक संपूर्ण महाराष्ट्रात नावाजले गेले. ‘धर्म ख्रिस्ताचा आणि संस्कृती भारताची’ ही वसईची जीवनपद्धती असल्याचे म्हटले जाते. याच वसईकरांसाठी सुरू केलेल्या सुवार्ता मासिकाचे पहिले संपादक स्व. बिशप डॉमनिक आब्रियो होय. त्यांनी इ.स. १९५५ ते १९७७ या दरम्यान मासिकाचे कामकाज पाहिले. ते धर्मशिक्षण घेत असतानाच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परीक्षेमार्फत साहित्य विशारद बनले. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठीत पदव्युत्तर पदवी घेतली. सुरुवातीला सुवार्ताचे अंक हे चार पानी निघत असे. त्यामध्ये आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी, सभा, संमेलने, बातम्या इत्यादी गोष्टींची माहिती देण्यात येत असे. यात सुधारणावादी धोरण ठेवून अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा यांविरोधात लिहिले जात होते, तसेच या माध्यमातून समाजाला योग्य ख्रिस्ती विचारांची दिशा देण्याचे कामही केले जात होते. सुवार्ता मासिकासाठी लेखन आणि वार्ताकन करणाऱ्यांची एक फळीच निर्माण झाली. त्यातून पुढे जाऊन दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारे साहित्यिक तयार झाले. @DishaKhatu disha.dk4@gmail.com