नातालिस या लॅटीन शब्दाच्या अपभ्रंशातून नाताळ या शब्दाची निर्मिती झालेली आहे. नातालिस म्हणजे जन्म, येशूचा जन्म साजरा करण्याचा दिवस होय. नाताळ सणावर पाश्चात्त्य परंपरांचा कितीही प्रभाव असला तरी भारतात स्थानिक पद्धतीनेच सण साजरा केला जातो. वसईतील नाताळ गोठय़ांचे काम शेवचटच्या टप्प्यात पोहोचलेले असेल तर नाताळ गीतांनी वातावरणात रंगत आणली असेल आणि आता उत्साहपूर्ण वातावरण आगमनाची तयारी पूर्ण होत असेल. नाताळमधील आकर्षण असलेले गोठे आणि गीतांविषयी थोडेसे जाणून घेऊ या..

येशूचा जन्म गोठय़ात झाला होता, तर जन्माचा देखावा आणि त्या काळाची प्रतिकृती म्हणून नाताळ गोठे बनवण्यात येतात. १२२३ साली संत फ्रान्सिस यांनी पहिल्यांदा इटलीमध्ये ही संकल्पना एका चर्चमध्ये नाताळ गोठा उभारून प्रस्तुत केली. त्यानंतर जगभरात ही प्रथा सुरू झाली. परंपरागत बनवण्यात येणाऱ्या नाताळ गोठय़ांमध्ये, सर्वसाधारणपणे बेथलेम गावाची पाश्र्वभूमी डोंगर, नद्या, गवताळ परिसर तसेच लाकडी गोठा, मध्यभागी बाळ म्हणजेच येशू आणि डोक्यावर रंगवण्यात आलेला तारा (येशूचा जन्म झाल्यावर आकाशात तारा उगवला होता त्याची प्रतिमा), एका बाजूला मेरी तर दुसऱ्या बाजूला जोसेफ, कोपऱ्यात बसलेली गाय, आपल्या मेंढरांसोबत गोठय़ाजवळ उभे असलेले मेंढपाळ (येशूचा जन्म झाल्यानंतर गोठय़ाजवळ मेंढपाळ मेंढरांना चारत होते, यांना देवदूतांनी दर्शन देऊन येशूच्या जन्माची सुवार्ता सांगितली आणि ते गोठय़ाकडे बाळ पाहण्यासाठी आले.) आणि भेटवस्तू घेऊन आलेले तीन राजे (जन्माची सुवार्ता पसरल्यानंतर पूर्व देशातील तीन राजे दर्शनासाठी जातात.) इतर सजावट, रोषणाई, विविध पद्धतीने केली जात असली तरीदेखील मूळ रचनेत या गोष्टी सर्वत्र पाहायला मिळतात.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..

वसईत चर्चच्या आवारात, सार्वजनिक ठिकाणी तसेच घरोघरी अंगात नाताळ गोठे बनवलेले आढळतात. घरच्या नाताळ गोठय़ांची स्पर्धा त्याचबरोबर सार्वजनिक गोठय़ांची स्पर्धा भरवण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सर्जनशीलतेचे प्रदर्शन करत असतात. मग स्पर्धा ही चुरशीची होते. सर्वसाधारणपणे घरच्या सजावटींसाठी, देवतांच्या मूर्त्यां, ख्रिसमस ट्री, दिव्यांची रोषणाई आणि सांता बाबाचे मुखवटे इत्यादी गोष्टी वापरण्यात येतात.

ही प्रथा युरोप, अमिरिकेपासून सर्वच देशांमध्ये आहे. मात्र यामध्ये नव्वदच्या दशकानंतर बदल झाला. वसईच्या नंदाखाल येथे तलावात नाताळ गोठय़ाचे चलतचित्र देखावे साकारणारे मार्शल लोपीस सांगतात, ‘तरुणांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिकरीत्या गोठे उभारू जाऊ  लागले. पुढे लोकांना सामजिक संदेश देण्यासाठी, समाजातील प्रश्न पुढे आणण्यासाठी आणि समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ  लागला. गोठय़ांची रचना थीमनुसार करण्यास सुरुवात केली.’ जागृत व्हावी या उद्देशाने धर्मगुरूंनी गावोगावी स्पर्धा सुरू केल्या. सणानिमित्त तरुणांना विधायक कामासाठी एकत्र आणले जाऊ  लागले.

वसईत गेल्या १८ वर्षांपासून अवि संस्था तलावामध्ये नाताळ गोठा उभारते. दरवर्षी एक विषय ठरवून त्यानुसार देखावा उभारून सादरीकरण करतात. शांती, एकात्मता, सर्वधर्मसमभाव इत्यादी विषय घेण्यात आलेले आहेत. तलावात लाइव्ह लाइट अ‍ॅण्ड साऊंड शो सादर करतात. हा कार्यक्रम नववर्ष येईपर्यंत सादर करतात. येशूच्या जन्मावेळी स्वर्गातून देवदूतांनी ‘स्वर्गात परमेश्वराला आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती’ असे गीत म्हटले होते. अनेक वर्षांपूर्वी युरोपमध्ये दगडाभोवती फेर धरून लोक नाताळ गाणी गात असे. नाताळ गीतांना ख्रिसमस कॅरल असे म्हणतात. कॅरोलियन या ग्रीक शब्दावरून कॅरल हा शब्द तयार झाल्याचे सांगितले जाते. त्याचा अर्थ लोकांनी एकत्र येऊन गोलाकार उभे राहून नृत्य करणे, गाणी गाणे होय. पहिले ज्ञात असलेले गीत चौथ्या शतकात रोममध्ये गायले गेलेले होते, असेही सांगितले जाते.

कालांतराने या गीतांना लोकप्रियता मिळू लागली. त्यांचा प्रसार होऊ  लागला. मग याचे परंपरेत रूपांतर झाले. आता जगभरातील लोकांना नाताळ कॅरल आकर्षित करतात.

तरुण मुले-मुली गावांत, शहरांत, सार्वजनिक ठिकाणी नाताळ वादकांसह गीते गातात. सध्या तर असे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ही गाणी येशूच्या जन्माची, गौरवगीते, आनंद व्यक्त करणारी गीते आणि स्तुती करणारी गीते असतात. जन्मोत्सवाचा दिवस जवळ येत आहे, आगमन काळ सुरू झालेला आहे तर तयारीला सुरुवात करा, असेही यातून सांगण्यात येते. यामुळे वातावरणात उत्साह निर्माण होतो. सणाची वातावरणनिर्मिती तयार केली जाते.

वसईतील धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो सांगतात, ‘साधारणत: १९६० नंतर जगभरातील सर्व चर्चची परिषद झाली. त्यानंतर संपूर्ण जगामध्ये प्रार्थना, गीते त्या-त्या स्थानिक भाषांमध्ये होऊ  लागले. त्या वेळी गीते आणि प्रार्थनांचे भाषांतर झाले.’ आज संपूर्ण जगभरातील स्थानिक भाषेतून ही नाताळ गाणी गायली जातात.

वसईचे वैशिष्टय़ असे की सर्व प्रार्थना, गीते मराठीत होतात. ब्रिटिश मिशनरी भारतात आल्यावर काही प्रमाणात भाषांतर तसेच स्वरचित गीते गाण्यास सुरुवात झाली, तसेच पूर्वी भजन, कीर्तन, आरत्याही म्हटल्या जात होत्या. चाल, पद्धत तीच ठेवून शब्द बदलण्यात आले होते. वसईला दोन उत्तम गीतकार लाभले एक म्हणजे फादर हिलेरी फर्नाडिस आणि दुसरे फादर डायगो परेरा. त्यांनी अनेक रचना मराठी भाषेत रचल्या. मग या मराठी गीतांची परंपरा सुरू झाली. ‘शांतीची ही रजनी, सुखाची ही कहाणी’ हे गीत अतिशय लोकप्रिय आहे. आणखी

वसईतील फादर ओनिस फरोज यांनी लिहिलेले, ‘बाळ जन्मले, विश्व आनंदले, विश्व अवतीभोवती झंकारले’ अशा प्रकारे बाळ जन्माची गाणी तरुण मंडळी गातात.

दिशा खातू

@Dishakhatu