प्रदूषण कमी करण्याचे आश्वासन हवेतच; नागरिकांत नाराजी
कल्याण-डोंबिवली शहरात महापालिका निवडणुकीमुळे विविध पक्षांचे नेते, मंत्र्यांच्या विविध भागांत प्रचार सभा सुरू आहेत. नेत्यांचे आगमन कार्यक्रमस्थळी झाले की वातावरणनिर्मिती करण्यासाठी हजारांच्या फटाक्यांची माळ पदाधिकाऱ्यांकडून लावली जाते. त्यामुळे पसरणारा धूर, फटाक्यांच्या आवाजामुळे सध्या कल्याण-डोंबिवली शहरात दिवाळीआधीच प्रदूषण वाढले आहे.
प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात आम्ही शहरातील प्रदूषण कमी करू म्हणून नेहमी आश्वासने दिली जातात. असे असताना भाषणबाज नेते, मंत्री आपले उत्साही कार्यकर्ते फटाके लावून प्रदूषण करीत आहेत त्यांना आवर का घालत नाहीत, असे प्रश्न रहिवासी करीत आहेत. अलीकडे संध्याकाळच्या वेळेत कुंद वातावरण असते. वारा नसतो. त्यामुळे फटाक्यांची माळ वाजवली की त्याचा धूर एकाच जागी राहतो. त्यामुळे या प्रदूषणाचा त्रास होऊ लागला आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
वाहतूक कोंडी
महापालिका निवडणुकीमुळे सर्व पक्षांचे मुंबई परिसरातील नेते, पदाधिकाऱ्यांना कल्याण -डोंबिवली शहरात राबता सुरू झाला आहे. गल्लीबोळात विविध पक्षांची प्रचार कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी पक्ष प्रचार कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. डोंबिवलीत मंजुनाथ शाळेला खेटून एका उमेदवाराचे पक्ष कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर पदाधिकाऱ्यांची वाहने, रिक्षांच्या रांगा अशा अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण आहेत. निवडणुका लढा पण आम्हाला का छळता, त्रास देता असा उद्विग्न सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे. आम्ही दोन तासांचा प्रवास करून मुंबईतून येतो आणि ही नेते मंडळी रस्त्यावर वाहने लावून खुशाल वाहतूक कोंडी करीत आहेत. शाखेपासून हाकेच्या अंतरावर वाहनतळ आहे तेथे नेऊन वाहने लावण्यात यावीत, अशी सूचना प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

निवडणुका आहेत. नेते, मंत्री येणार. भाषण करणार. ते करा. पण हल्ली नेता आला की मोठी फटाक्यांची माळ वाजवली जाते. सर्व परिसर प्रदूषित केला जातो. हे सगळे पक्षांच्या नेत्या, मंत्र्यांसमोर केले जाते आहे. व्यासपीठावरून शहर प्रदूषण मुक्त करणार म्हणून लोकांना आश्वासने द्यायची आणि व्यासपीठाच्या मागे फटाके फोडून प्रदूषण करायचे. हे कुठल्या तत्त्वात बसते. आपण लोकांना उघडपणे फसवत आहोत याचे थोडे तरी भान सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी ठेवून आपल्या उत्साही कार्यकर्त्यांना थोडा आवर घालावा. नेत्यांनीही अशा उत्साही मंडळींना समज द्यावी.
– अ‍ॅड. शांताराम दातार, ज्येष्ठ वकील, कल्याण</p>