पाच गावांचे सर्वेक्षण न झाल्यामुळे बांधकाम करण्यास अडथळे भाईंदर : मीरा-भाईंदर शहराच्या ‘सिटी सव्र्हे’चे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले गेले आहे. त्यामुळे पाच गावांचे सर्वेक्षण झाले नसून या गावात राहणाऱ्या मूळ रहिवाशांना बांधकाम परवानगी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्राचे गावांचे नगर भूमापन करण्याचे काम खासगी संस्थेमार्फत करण्याचा ठराव २००३ साली मंजूर करण्यात आला होता. या कामासाठी महापालिकेच्या २००३-०४ च्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली.त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रशासकीय व आर्थिक मंजुरीसाठी पाठवण्यात आला. शासनाने प्रस्ताव मंजूर करून खाजगी सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीकडून करून घेण्याचा ३० जानेवारी २००७ साली आदेश दिला. त्यानुसार महापालिकेने सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढून तीन खाजगी कंपनीला कंत्राट दिले . त्यातील १९ पैकी १४ गावांचा मोजणीचे काम २००८ साली पूर्ण झाले.मात्र त्यावेळी या सर्वेक्षणाला उत्तन, डोंगरी, चौक, पाली व तरोडी या पाच गावातील नागरिकांनी विरोध दर्शविला होता . सर्वेक्षणाचे काम न झालेल्या पाच गावांबाबत तत्कालीन जमाबंदी आयुक्त यांच्या दालनात २१सप्टेंबर २०१० रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आयुक्तांनी सदर प्रकरणी भुमापण न झालेल्या पाच गावांबाबत महापालिकेला जातीने लक्ष घालून संबंधित संस्थेस मदत करणे बाबतच्या सूचना दिल्या होत्या. पालिकेने पाच गावातील नगरभूमापन कामाच्या बाबतची माहिती संबंधित विभागाला कळवली तसेच महापालिका क्षेत्रातील मोजणी पूर्ण झालेल्या १४ गावांना बाबत चौकशी अधिकारी नेमणूक करून भूमापन चे काम पूर्ण करण्याबाबतचे कळवले होते. मात्र अद्याप ते काम रखडले गेल्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना मालकी सनद मिळत नाही आहे. महानगरपालिकेच्या महासभेत संताप मीरा-भाईंदर शहरातील ‘सिटी सर्वे’चे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले गेले असताना पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्षपणा करत आहे. त्यामुळे या शहरातील मूळ रहिवाश्यावर दुरुस्ती अभावी घर सोडण्याची वेळ आली आहे. तर इतर बाहेरून आलेल्या झोपडपट्टी धारकांना देखील पालिका घर देण्याचे काम करते. मात्र गावातील मूळ रहिवाशांकडे कानाडोळा करत असल्याचे आरोप भाजप नगरसेविका प्रतिभा पाटील यांनी महासभेत केला. या महिन्यात अखेरीस ‘सिटी सव्र्हे’चे काम करण्यात येणार असून या करीता विशेष तपास अधिकारी निवडण्यात यावा अशी मागणी पालिका प्रशासनाने संबंधित विभागाला केली आहे. -विजय राठोड, आयुक्त (मीरा-भाईंदर महानगरपालिका )