सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अंबरनाथ नगरपालिकेच्या एका संतप्त महिला कर्मचाऱ्याने स्वच्छता निरीक्षक सुभाष साळुंके यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला.

साळुंके गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकरणांमुळे चर्चेत आहेत. नगरपालिकेचे भंगार विकणे प्रकरण तसेच बनावट कागदपत्रे दाखवून बढती मिळवण्याच्या प्रकरणातही ते वादग्रस्त ठरले आहेत.  या पाश्र्वभूमीवर एका महिला कर्मचाऱ्याने सोमवारी त्यांना मारहाण केल्याने नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली. मोरीवली शेडवर कार्यरत असलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना मागील काही दिवसांपासून संबंधित निरीक्षक कामावरून काढून टाकू, असे धमकावित असल्याची तक्रार पुढे आली आहे. तसेच पगार मिळू देणार नाही, अशा धमक्या देत मानसिक त्रास देत होता, अशी तक्रारही या महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सोमवारी असाच प्रकार घडला. तसेच साळुंके याने आपणास शिवीगाळ केली. त्यामुळे आपण मारहाण केल्याचे या महिलेने केलेल्या खुलाशात म्हटले आहे.