वर्षांनुवर्षे जंगलात राहणारे आदिवासी हेच वनांचे खरेखुरे रक्षक असून त्यांच्या माध्यमातूनच जंगलतोड रोखली जाऊ शकते, हे पटल्यानंतर शासनाने आदिवासी गावांना सामूहिक वनहक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धोरणानुसार आता ठाणे जिल्ह्य़ातील काही गावांनी परिसरातील जंगलसंपदा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषत: शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील अनेक गावांनी कसोशीने हिरवाई जपत त्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळविला आहे. मुरबाड तालुक्यातील भांगवाडीतील तरुणांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्य़ातील इतर गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे मंगळवार ३ मार्च रोजी खुद्द राज्यपाल सी.व्ही.राव भांगवाडीला येऊन तेथील तरुणांशी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते भांगवाडीसह परिसरातील इतर चार गावांना सामूहिक वनहक्क प्रदान केले जाणार आहेत. बौद्धिक संपदेचीही मालकी सामूहिक वनहक्क कायद्यान्वये स्थानिक आदिवासींना परंपरेने ज्ञात असलेल्या बौद्धिक संपदेचाही मालकी हक्क प्रदान करण्यात आला आहे. डोंगरदऱ्यात आणि जंगलात अनेक औषधी वनस्पती आढळतात. त्यांचा वापर करून आदिवासी समाज आपले आरोग्य राखतो. रानातल्या भाज्याही एक उत्तम पोषक आहार असल्याचे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहे. विविध ऋतूंमध्ये आढळणाऱ्या या भाज्यांमुळे आदिवासींचे कुपोषण रोखले जातेच, शिवाय जवळील बाजारपेठांमध्ये त्यांची विक्री करून त्यांना उत्पन्नही मिळू शकते.* मुरबाडपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेली भांगवाडी तसेच परिसरातील दुर्गापूर, भेरेवाडी, भोरांडा आणि शिसेवाडी या गावांना सरासरी प्रत्येकी शंभर हेक्टर जंगलावर सामूहिक वनहक्क देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. * या परिसरातील जंगलात आंबा, काजू, चिकू, पेरू, करवंद, जांभूळ, मोह आदी फळझाडे, औषधी वनस्पती तसेच रानभाज्या आढळून येतात. मोहाच्या बियांपासून स्थानिक गावकरी तेल बनवितात. *गेल्या पर्यावरणदिनीभांगवाडीत भरविण्यात आलेल्या निसर्गदेवाच्या यात्रेत स्थानिक आदिवासी महिलांनी परिसरात आढळणाऱ्या तब्बल २२ प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनात मांडल्या होत्या. * मुरबाड परिसरातील जंगलात वर्षभरात साठपेक्षा अधिक प्रकारच्या रानभाज्या आढळून येतात