tv11शाळेतून महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर विद्यार्थी खऱ्या अर्थाने सामाजिक जीवनाचा भाग बनतो. महाविद्यालयीन शिक्षण, अभ्यासक्रम, वातावरण, वयपरत्वे मिळणारे घटनात्मक अधिकार या साऱ्या गोष्टी महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत घडत असतात. अशा वेळी समाजकार्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजली तर भविष्यात तीच त्यांची प्रेरणा बनते. याच पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सामाजिक उपक्रमांना कितपत महत्त्व दिले जाते, हे जाणून घेण्यासाठी ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘कट्टय़ावरील गोलमेज’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांत राबवले जाणारे सामाजिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा त्याबद्दलचा दृष्टिकोन यावर विस्तृत चर्चा केली. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांसाठी महाविद्यालयांनी अधिक पाठबळ दिले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

महाविद्यालयांत होणारे सामाजिक उपक्रम
अनुराधा गंगावणे
एनएसएसमध्ये सर्वात प्रथम आम्हाला सांगितले जाते ते म्हणजे ‘नॉट मी, बट यू’. त्यामुळे दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण होते. तिथे आम्ही विद्यार्थी नसतो तर स्वयंसेवकाची भूमिका पार पडत असतो. युनिटअंतर्गत अनेक उपक्रम होत असतात. शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वाढीस लागण्यास मदत होते. तसेच युनिटच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात पक्ष्यांसाठी पाणपोई बांधलेली आहे. हे सगळे विद्यार्थी तर करतच असतात पण उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना कल्पना रामदास, प्रफुल्ल भोसले आणि इतर प्राध्यापकांचे खूप सहकार्य लाभते. कोणत्याही उपक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापक एकत्र निर्णय घेतात. तसेच युनिटमध्ये नवीन येणाऱ्या नवीन मुलांसाठी वेल्कम पार्टी आयोजित केली जाते, त्या वेळी नृत्य, गायन यांसारखे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. या सगळ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
UPSC Result, UPSC Result Marathi News, UPSC Civil Services Final Result 2023 Out
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

पंकज चव्हाण
जोशी-बेडेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण यासारख्या पारंपरिक उपक्रमांबरोबरच नव्या धाटणीचे उपक्रम सुरू करण्याचा महाविद्यालयाचा नेहमीच प्रयत्न असतो. केवळ वृक्ष लागवड करण्यापुरते हे काम मर्यादित न ठेवता. त्या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विशेष प्रयत्न केले जातात. महाविद्यालयाने ‘इच वन टीच वन’ हा नवा उपक्रम यंदा सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या आवारात राहणारे महाविद्यालयाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना शिकवण्याचा हा उपक्रम होता. त्याला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला तर त्या कुटंबीयांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

अंजली पाटील
बांदोडकर महाविद्यालयाला स्वत:चे असे राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट असून दोनशे विद्यार्थ्यांची मर्यादा या युनिटला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटकडून महाविद्यालयात व इतरत्र विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. स्किन डोनेशन, एड्स जनजागृती रॅलीसारखे विविध उपक्रम युनिटतर्फे राबविण्यात येतात. महिन्यातून एक-दोनदा महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात येते आणि त्यामार्फत महाविद्यालयाची इमारत स्वच्छ केली जाते.

सिद्धेश शेळके
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालय नेहमी प्रयत्नशील असते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकी जागृत व्हावी यासाठी नेहमीच वैविध्यपुर्ण उपक्रम हाती घेतले जातात. रक्तदान, अवयव दान, वृक्षारोपणसारख्या उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

रोशनी गुजराथी
ज्ञानसाधना महाविद्यालयाचे वैशिष्टय़ म्हणजे वर्षांचे ३६५ दिवस येथील एनएसएस सक्रियरीत्या कार्यरत असते. त्या माध्यमातून आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले. जसे मुलींसाठी स्वरक्षण शिबीर, रस्ता सुरक्षा अभियान, स्वच्छता अभियान आदी उपक्रम या माध्यमातून सतत सुरू असतात.

विशाखा सावंत
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान, अवयवदान यांसारखे विविध उपक्रम वेळोवेळी राबविले जात असतात. त्याचप्रमाणे निवासी वर्गाचेही आयोजन युनिटतर्फे करण्यात येते. जेणेकरून वर्गाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यास मदत होऊ शकेल. त्याचप्रमाणे ‘नो टॉबेको डे’ युनिटतर्फे राबविण्यात येतो. तंबाखू आणि तत्सम व्यसनांची सुरुवात महाविद्यालयीन वयापासूनच होते. त्यामुळे या काळातच विद्यार्थ्यांना त्याचे दुष्परिणाम कळले तर त्याचा फायदा नक्कीच त्यांचे भावी आयुष्य निरोगी होण्यास मदत होईल.

हेमंत मोरे
ग्रामीण भागातील महाविद्यालय असूनही राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत असते. केवळ १० गुणांसाठी नव्हे तर प्रत्यक्ष कामाची इच्छा असलेल्या तरुणांचा भरणा मोठा आहे. त्यामुळे चांगले उपक्रम राबवण्यासाठी महाविद्यालय नेहमीच आग्रही असतो. २०० विद्यार्थ्यांचे युनिट असून महाविद्यालयाच्या या विभागाकडे विद्यापीठातील मान्यवरांचेदेखील विशेष लक्ष आहे.

सुशांत शेट्टी
नुकतेच ५ जून रोजी युनिटतर्फे वृक्षलागवड मोहिमेचे आयोजन केले होते. महाविद्यालयाच्या आवारातही राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड करण्यात येते. वर्षभरातून एकदा सातदिवसीय शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात येते. शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यास मदत होते. युनिटतर्फे उल्हासनगर येथे मतदान जागरूकता मोहीम राबविण्यात येते. नुकतेच तहसीलदार कार्यालय आणि सी.एच.एम राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जागरूकता मोहीम राबविण्यात आली.

‘एनएसएस’च्या पलीकडे काय होते?
सिद्धेश शेळके
वर्षभर ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची नांदी असते. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा, व्याख्याने घेतली जातात. परिसंवाद, सायबर सेफ्टी, विविध विषयांवरील राष्ट्रीय परिषद आदी उपक्रम ज्ञानसाधना महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येतात. उपक्रमांच्या माध्यमातून जे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेऊ शकत नाहीत त्यांना याचा लाभ घेता येतो.

पंकज चव्हाण
जोशी बेडेकर महाविद्यालयात सगळेच उपक्रम उत्साहाने केले जातात. सामाजिक उपक्रमांसाठीसुद्धा प्राचार्या शकुंतला सिंग यांचा खूप पाठिंबा असतो. महाविद्यालयाच्या माध्यमातून एका सामाजिक संस्थेसाठी विद्यार्थी काम करत असतात. महाविद्यालयाचे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अनेक सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. माजी विद्यार्थी असलेला अनिल कुलकर्णी या विद्यार्थ्यांने आपली सामाजिक संस्था स्थापन केली. अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून इतर सामाजिक कामे केली जातात.

रोशनी गुजराथी
विद्यापीठाकडून राष्ट्रीय सेवा योजनेकरिता विद्यार्थ्यांच्या मर्यादा असतात. त्यामुळे र्सवच विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभाग घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या साहाय्याने इतर विद्यार्थ्यांकरीत विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये एड्स जनजागृती, सिव्हिल डिफेन्स, स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविले जातात.

या उपक्रमांत नावीन्य हवे का?
पंकज चव्हाण
जुने अनेक उपक्रम यशस्वी होत असतात, पण नव्याने काहीतरी करण्याची गरज आहे. चौकटीबाहेर जाऊन नवीन उपक्रम हाती घेण्यासोबतच त्याबद्दलच्या मतपरिवर्तनाची ही गरज आहे. ‘एनएसएस’ म्हणजे केवळ काम ही प्रत्येकाची मानसिकता बनली आहे. ती बदलण्याची गरज आहे. आपण समाज सुधारत नसतो तर आपण स्वत: सुधारत असतो, ही जाणीव मनात ठेवली तर आपल्याकडून उत्तम कामे घडतील. अनेक महाविद्यालयीन तरुणांना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय हेच ठाऊक नसते. यासाठी शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल माहिती द्यायला हवी.

सिद्धेश शेळके
कोणत्याही कामामध्ये तोचतोचपणा आला तर त्या कामाचा कंटाळा येऊ लागतो,  हे सर्वसामान्य आहे. त्याप्रमाणे महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये नक्कीच नावीन्य येणे ही काळाची गरज आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. काळानुसार अनेक गोष्टींमध्ये बदल होत असतात. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची आवड निर्माण करण्यासाठी नेहमीच नवीन उपक्रमांचा अवलंब करणे गरजेचे असते. त्यासाठी महाविद्यालयीन व्यवस्थापनाने फेरविचार करण्याची गरज आहे.

रोशनी गुजराथी
सामाजिक उपक्रमांमध्ये साचेबद्धता जाणवते आणि ते बदलणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजसेवेची आवड निर्माण करण्यासाठी आधुनिक विचारांचा अवलंब करणे गरजेचे आहे. उपक्रमांची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर देऊन, शिक्षकांनी केवळ नियंत्रण करावे, जेणेकरून विद्यार्थी या उपक्रमांमध्ये स्वावलंबी होऊ शकतील. तसेच विद्यार्थी जर एखाद्या चांगल्या गोष्टींसाठी एकत्र येत असतील तर व्यवस्थापनाने त्यांना सहकार्य केले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.

विशाखा सावंत
आम्ही महाविद्यालयात नवनवीन उपक्रम राबवत असतो जेणेकरून उपक्रमात साचेबद्धपणा येणार नाही. महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांच्या साहाय्याने महाविद्यालयाच्या मधोमध विविध झाडे असणारी एक सुंदर बाग बनविण्यात आलेली आहे. महाविद्यालयातील एनएसएसची विद्यार्थीसंख्या विद्यापीठाकडून मर्यादित ठेवण्यात येते. या मर्यादा शिथिल करून विद्यार्थीसंख्या वाढवण्याची गरज आहे. अनेक एनएसएसमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असतात, परंतु विद्यार्थीसंख्येच्या मर्यादेमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे या मर्यादेविषयीचे नियम विद्यापीठाने बदलण्याची आवश्यकता आहे. ठाण्यातील एका मुलीने रिक्षाचालकाच्या गुन्हेगारी वृत्तीला घाबरून चालत्या रिक्षातून उडी मारून बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती जबर जखमी झाली होती. असे प्रसंग मुलींवर येऊ नयेत यासाठी महाविद्यालयीन मुलींनी ठाण्यातील रिक्षाचालकांना राखी बांधून एक वेगळा उपक्रम राबवला. या माध्यमातून रिक्षाचालकांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होऊ शकते.

सुशांत शेट्टी
राष्ट्रीय सेवा योजनाही विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त दहा मार्कापुरती मर्यादित राहिलेली आहे. सामाजिक उपक्रमातील साचेबद्धपणा दूर होण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या कलेने नवनवीन उपक्रम राबविण्याची गरज आहे. जर असे झाले तर आपोआप राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयात पुन्हा भरारी मारू शकेल.

सोशल नेटवर्किंगचा कितपत परिणाम होतो?
अंजली पाटील
एनएसएस किंवा महाविद्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांविषयी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर माहिती, फोटो टाकणे गरजेचे आहे. आज सर्व तरुण मंडळी सढळ हाताने सोशल मीडियाचा वापर करत असतात. त्यामुळे या गोष्टींनाही या माध्यमातून प्रसिद्धी मिळते व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपण केलेल्या सामाजिक उपक्रमांची आठवणही आपल्याला सोशल मीडियाद्वारे होते.

विशाखा सावंत – सामाजिक जाणिवा वाढवण्यासाठी सोशल नेटवर्किंगचे माध्यम अधिक प्रभावी आहे. सोसायटीतील स्वच्छता मोहीम असो, रक्तदान असो, वृक्षारोपण करतानाचा फोटो पाहिल्यानंतर आपण तिथे हवे होते असे वाटते. त्यामुळे सोशल नेटवर्किंगवरील सामाजिक कामाचे छायाचित्र प्रेरणा देत असतात.
रोशनी गुजराथी- सोशल नेटवर्किंग साइटमुळे कार्यक्रमांची माहिती अधिक वेगामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवता येत असल्याने सामाजिक कामे करण्यासाठी हे माध्यम एक वरदान आहे. अनेक सामाजिक कामांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत अशा वेळी ते छायाचित्र अनेकांना प्रेरणा देऊन जाते.
अनुराधा गंगावणे – आपण केलेल्या कामाचा आपल्याकडे पुरावा राहतो. जेव्हा आपण हे जुने छायाचित्र चाळतो त्या वेळी आपण केलेल्या कामाचे एक चांगले समाधान आपणास मिळते.

सुटीच्या काळात काही करता येईल का?
सिद्धेश शेळके- सुटीच्या काळात अनेक विद्यार्थी बाहेरगावी गेलेले असतात, त्यामुळे उपक्रम राबविणे तसे कठीण जाते. परंतु काही विद्यार्थी वर्षभर राष्ट्रीय सेवा दलामध्ये सक्रिय असतात. ते सुट्टीच्या काळातही अनेक लहान मोठे उपक्रम राबवत असतात.
रोशनी गुजराथी- सुटीच्या काळात विद्यार्थी जास्त सक्रिय नसतात. परंतु समाजसेवीची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुटीच्या काळातही काही ना काही सामाजिक कार्य करत राहावे असे मला वाटते. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यामातून विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते, त्यांचा उपयोग करून सतत समाजासाठी काहीतरी करत राहिले पाहिजे.
पंकज चव्हाण – सुटीच्या दिवसात व्यक्तिगत पातळीवर आपण खूप कामे करू शकतो. आसपासच्या परिसरात वीज बचतीबाबत जनजागृती करण्यासारखे कार्यक्रम आपण करू शकतो. स्वत: जबाबदारी घ्यायला लागलो की आपल्याकडून चांगली कामे होत राहतात.

महाविद्यालयाने एखाद्या सामाजिक संस्थेशी संलग्न व्हायला हवे का?
सिद्धेश शेळके- महाविद्यालय जर सामाजिक संस्थांशी संलग्न झाले तर अनेक सामाजिक कामांना विद्यार्थ्यांचा हातभार लागू शकेल. सामाजिक संस्थाच्या साहाय्याने गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, पाणपोई बांधणे, आदी कामे केली गेली आहेत. ज्ञानसाधना महाविद्यालयाचे वैशिष्टय़ म्हणजे संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी धरण बांधण्यासही सहकार्य केले आहे.
रोशनी गुजराथी – महाविद्यालयांच्या साहाय्याने सामाजिक संस्थांना कार्य करण्यास मदत होऊ शकेल. ज्ञानसाधना महाविद्यालय रोट्रॅक्ट क्लबसारख्या काही संस्थांशी संलग्न आहे. संस्थांच्या साहाय्याने अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.
पंकज चव्हाण -महाविद्यालयाने एखाद्या सामाजिक संस्थेशी संलग्न झाल्यास ते फायदेशीर ठरेल कारण कोणत्याही सामाजिक कामासाठी मनुष्यबळ आवश्यक असते. महाविद्यालयातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने त्या संस्थेशी जोडले गेल्यास अनेक समाजोपयोगी कामे घडतील. जोशी-बेडेकर महाविद्यालय समतोल या सामाजिक संस्थेशी संलग्न आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या संस्थेतील लहान मुलांसोबत बालदिन साजरा केला होता.
विशाखा सावंत – महाविद्यालयांनी सामाजिक संस्थांशी संलग्न होणे गरजेचे आहे. सामाजिक संस्थांशी महाविद्यालय जर संलग्न झाले तर सामाजिक उपक्रमांचा मोठय़ा प्रमाणात विस्तार होण्यास सुरुवात होईल आणि सामाजिक कार्य मोठय़ा स्तरावर जाण्यास मदत होईल.