स्वत:चे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्थानिक कलाकारांची आयोजकांना गळ मराठी साहित्याचे बदलते पैलू, विषय, भाषा अशा विषयांवर सांगोपांग चर्चा घडवून आणण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अवांतर विषयांचीच चर्चा रंगत असल्याच्या तक्रारी दरवर्षी ऐकायला मिळतात. परंतु येत्या फेब्रुवारीत डोंबिवलीमध्ये होऊ घातलेल्या साहित्य संमेलनात तर साहित्यापेक्षा सांस्कृतिक कार्यक्रमांचीच अधिक चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. या संमेलनात स्थानिक कलाकारांना एखादे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, यासाठी आयोजकांनी बोलावलेल्या बैठकीत जवळपास प्रत्येक कलाकाराने आपला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावा, अशी गळ घातल्याने आयोजकांची तारांबळ उडत आहे. डोंबिवली शहरात पार पडणाऱ्या साहित्य संमेलनाची ओळख कायमस्वरूपी रसिकांच्या मनावर राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून डोंबिवली परिसरातील कलाकारांना संमेलनात एखादे व्यासपीठ देता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी संमेलनाचे आयोजक असलेल्या आगरी युथ फोरमने ३ डिसेंबर रोजी एका बैठकीचे आयोजन केले होते. परंतु काही कलाकारांना या बैठकीत उपस्थित राहता न आल्याने १७ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा कलाकारांची बैठक पार पडली. या बैठकीला संगीत, नृत्य, गायन, गझलकार, कवी, चित्रकार, अनुवादक आदी विविध क्षेत्रांतील कलाकार उपस्थित होते. या वेळी उपस्थित कलाकारांनी सर्व कलाकारांचा एकत्रित कार्यक्रम ठेवण्याऐवजी प्रत्येकाला स्वतंत्र संधी द्यावी असा आग्रह धरला. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी प्रत्येकाला आपली कला सादर करण्यासाठी काही मिनिटांचा अवधी दिला जाईल, असे सांगत त्या वेळी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत माने यांनी ‘हे साहित्य संमेलन आहे, सांस्कृतिक संमेलन नाही. आपण सर्वानी मिळून साहित्यविषयक काही कार्यक्रम सादर करायचे आहेत,’ असे सांगत या कलाकारांचे कान टोचले. या बैठकीत सांस्कृतिक कार्यक्रमांसदर्भात एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. डोंबिवली शहराची महती सांगणारा विशिष्ट कार्यक्रम संमेलनाच्या निमित्ताने सादर करता येईल, असे आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले. त्यानुसार सर्व कलाकारांनी आपापसात मेळ साधून या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवावी. तसेच १५ व १६ जानेवारीला या कार्यक्रमाची रंगीत तालीम करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. या कार्यक्रमात कोण सहभागी होईल याचा अंतिम निर्णय समितीवर राहील, असेही या बैठकीत ठरवण्यात आले.