करोना संशयितांना वेळेवर अन्नपाणी नाही, स्वच्छतेचाही अभाव

वसई : पालिकेच्या अलगीकरण केंद्रात करोनाबाधितांची परवड सुरू आहे. पालिकेच्या वालीव येथील अलगीकरण केंद्रात करोनाबाधितांचे हाल होत आहेत. वेळेवर अन्न नाही, केंद्रात स्वच्छतेचाही अभाव असल्याचे चित्र आहे.

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पाश्?र्वभूमीवर पालिकेच्या अलगीकरण केंद्रातील बाधितांची परवड होत आहे आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पालिकेच्या वालीव येथील अलगीकरण केंद्रात  संशयितांना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांना वेळेवर अन्न मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. याशिवाय येथे गरम पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेत आहेत, त्यांच्या सुरक्षेकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी सांगितले.

पालिकेच्या कौल सिटी येथील अलगीकरण केंद्राची अवस्थाही बिकट आहे. या ठिकाणी पुरेसे सफाई कर्मचारी नसल्याने केंद्रात स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. सफाई कर्मचाऱ्यांअभावी पालिकेच्या विविध विभागांतील कामगार केंद्रात सफाई करतात. मात्र काम करताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणेही पुरवली जात नाहीत. ही बाब केंद्रातील कर्मचाऱ्यांनी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज यांच्याही निदर्शनास आणून दिली होती. या केंद्रावर महिनाभर पुरेल इतके साहित्य पाठवण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

वैयक्तिक संरक्षणासाठीची साधने सर्वाना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.  वालीव केंद्रावर महिनाभर पुरेल इतके साहित्य पाठवले आहे. शिवाय वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत.

 – डॉ. किशोर गवस, पालिका उपायुक्त

कौल सिटीतील अलगीकरण केंद्राला मी भेट दिली. त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी  साहित्याची मागणी केली होती. ते त्यांना पुरवले आहे.

– प्रकाश रॉड्रिग्ज, उपमहापौर