विरार : करोना विषाणूमुळे वसई-विरारमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या वसई विरार मध्ये करोनाचा कोणताही रुग्ण आढळून आला नसला तरी समाजमाध्यमांवरील अफवांमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने खबदारी म्हणून ३१ मार्चपर्यंत सर्वच सार्वजनिक कार्याकार्मावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय, तरण तलाव, शिकवण्या, फिटनेस सेंटर, व्यायाम शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. तर छोटय़ा व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. रिसॉर्ट बंद ठेवण्याचे आदेश करोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत रिसॉर्ट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सध्या वसई तालुक्यातील ५० मोठे तर २५० हून अधिक लहान रिसॉर्ट बंद आहेत. रिसॉर्टचालकांना आर्थिक फटका बसणार असल्याने सरकारने सहानूभूती दाखवत रिसॉर्टधारकांना करामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी अर्नाळा, राजवाडी, नवापूर रिसोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मेहेर यांनी केली आहे. खाजगी बस सेवा डबघाईला गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, शक्य असल्यास प्रवास टाळावा यासाठी नागरिक प्रवास करण्याचे टाळत असल्याने खाजगी बस सेवेकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. सध्या वसई-विरारमधील खासगी बस व्यावसायिकांना करोनाचा फटका बसला आहे. ५० टक्क्यांहून अधिक कमी व्यवसाय होत आहे. त्याचबरोबर आगाऊ तिकीट खरेदी करणारे प्रवासी आरक्षण रद्द करत आहेत. यामुळे बस व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. केवळ १० ते १२ प्रवासी घेऊन फेऱ्या पूर्ण कराव्या लागत आहेत. त्याचा बरोबर करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बस निर्जंतुक करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याची माहिती साई श्रद्धा ट्रॅव्हल्सचे मालक प्रभाकर शिंदे यांनी दिली. धार्मिक, पर्यटनस्थळावर मनाई आदेश राज्यात धार्मिक आणि पर्यटनस्थळावर मनाई आदेश लागू करण्यात आले असले तरी वसई-विरारमध्ये अद्यापही असे कोणतेही आदेश देण्यात आले नव्हते. पण सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून १६ मार्च ते ३१ मार्चपर्यंत येण्यास मनाई केली आहे. तसेच या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वसईमध्ये अर्नाळा, राजावाडी, नवापूर, कळंब, पाचूबंदर असे समुद्रकिनारे आहेत. तिथे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. विरारचे जीवदानी मंदिर, वाघोलीचे शनी मंदिर, खानिवडेतील महालक्ष्मी मंदिर, तुंगारेश्वर मंदिर, सदानंद बाबा आश्रम, अशा ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम घेतले जाणार नाहीत. मॉल, तरणतलाव, शिकवण्या बंद वसई तालुक्यातील सर्व खासगी शिकवण्या, तरण तलाव, मॉल बंद केले आहेत. सुपरमार्केटमध्ये केवळ जीवनाश्यक वस्तूंची विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बिग बाजार, डी मार्ट हे जरी बंद नसले तरी तिथे केवळ जीवनाश्यक वस्तू मिळणार आहेत. पोलीस ठाण्यात मास्कशिवाय प्रवेश नाही करोना विषाणूचा मोठा धसका पोलीस यंत्रणेने घेतला आहे.तुळींज पोलिसांनी तर चक्क मास्क लाऊनच पोलीस ठाण्यात यावे अन्यथा येऊ नये, असे फलक दरवाजावर लावले आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विलगीकरण कक्षाला विरोध मावळला वैतरणा फणसपाडा या ठिकाणी महापालिकने २० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र या कक्षाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. या कक्षाशेजारी शाळा असून ग्रामस्थांनाही याची बाधा होऊ शकते, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले होते. पण महापालिका अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय प्रमुख डॉ. तबस्सुम काझी यांनी समजूत काढल्याने हा विरोध मावळला. मीरा-भाईंदर महापालिकेत दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेशबंदी राज्यात करोना विषाणूच्या रुग्णात वाढ होत असल्यामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून खबरदारीची पावले म्हणून तीन वाजेपर्यंत नागरिकांकरिता प्रवेशबंदी नियम लागू करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. या निर्णयाअंतर्गत पालिका मुख्यालयासह अन्य प्रभाग कार्यलायालाही तसेच निर्देश देण्यात आले आहे. शेअरिंग रिक्षास नकार रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहनांवरही करोनाचा प्रभाव दिसून येत आहे. शेअरिंगणे प्रवास करावा लागत असल्याने नागरिक आता खास रिक्षा करून जाणे अथवा चालत जाणे पसंत करत आहेत. त्यातही आता करोनाची धास्ती रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहनचालकांनी घेतली आहे. हे वाहन चालक मास्क वापरून वाहने चालवत आहेत, अशी माहिती रिक्षाचालक मालक मित्र मंडळ संघटनेचे अध्यक्ष प्रेमचंद गुप्ता यांनी दिली.