पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीपासून ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाला आता टाळेबंदीनंतर हळूहळू उभारी मिळत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले असून ही बाब लक्षात घेऊन सहल कंपन्यांनी नाताळ तसेच नवीन वर्षांच्या निमिताने ग्राहकांसाठी विविध आकर्षक असे सहस पॅकेज देण्यास सुरुवात केली आहे. त्यास पर्यटकांकडून प्रतिसाद मिळण्याचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास आहे. तसेच गोवा, सिमला, मनाली, दिल्ली, राजस्थान येथील पर्यटनास पर्यटक पसंती देत आहेत, असे सहल कंपन्यांकडून सांगण्यात आले.

नाताळ तसेच नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेकजण सहलीचा पर्याय निवडतात. त्यामुळे या काळात दरवर्षी विविध पर्यटनस्थळांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. मात्र, यंदा करोनाच्या सावटामुळे इतर सणांप्रमाणेच नाताळ तसेच नवीन वर्षांचे स्वागत साध्याच पद्धतीने करावे लागते की काय असा प्रश्न सर्वानाच पडला होता. करोना टाळेबंदीच्या काळापासून पर्यटन व्यवसाय बंद असून त्याचा सर्वाधिक फटका सहल कंपन्यांना बसला आहे. करोना टाळेबंदी शिथिलीकरणानंतर बाजारपेठा, दुकाने, मॉल, चित्रपटगृहे खुले करण्यात आले असून त्याचबरोबर नागरिकही आता पर्यटनासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. यामुळे करोना टाळेबंदीपासून ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाला आता उभारी मिळू लागल्याचे चित्र आहे.

नागरिक आता पर्यटनासाठी घराबाहेर पडत असल्याचे लक्षात घेऊन पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या सहल कंपन्यांनी आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सहल पॅकेज देण्यास सुरुवात केली आहे. तसेच नाताळ सण आणि नवीन वर्षांनिमित्ताने सहल कंपन्यांनी पर्यटकांची नोंदणी सुरू केली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  सहल कंपन्यांनी विविध आकर्षक सवलती जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यास पर्यटकांकडून प्रतिसाद मिळण्याचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव असला तरी टाळेबंदीनंतर नागरिकांना पर्यटनासाठी जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे करोनाच्या पाश्र्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊनच आम्ही पर्यटनाचे आयोजन करत असल्याचे परफेक्ट हॉलिडेज प्लॅनरचे मुख्य व्यवस्थापक रोहन ढवळे यांनी सांगितले.

अंतरराज्य पर्यटनाला सर्वाधिक पसंती

पर्यटनामध्ये जास्त करून गोवा आणि अंतरराज्य पर्यटनाला पर्यटकांचा जास्त प्रतिसाद मिळत आहे. करोनामुळे प्रत्येकावरच आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे गोवा, कोकण, महाबळेश्वर आणि लोणावळा या ठिकाणी पर्यटनाचा खर्च कमी असल्यामुळे पर्यटकांचा या ठिकाणी जाण्यास जास्त कल आहे, असे सहल कंपन्यांकडून सांगण्यात आले.

नाताळ तसेच नवीन वर्ष हा पर्यटनाचा हंगाम आहे. या हंगामात दरवर्षी पर्यटनाला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा करोनामुळे पर्यटनामध्ये घट झाली आहे. असे असले तरी करोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाला नाताळ आणि नववर्षांनिमित्ताने आयोजित सहलीमधून काहीसा आर्थिक दिलासा मिळत आहे.
– सनिकित चव्हाण, प्रमुख, टीम अँड ट्रॅव्हल्स कंपनी