कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला असून त्याचे पालन न करणाऱ्या व्यवसायिकांवर कलम १८८ नूसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात एक पत्रक आय़ुक्तांनी जारी केलं आहे. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव अधिक वाढण्याची शक्यता गृहीत धरून हा कल्याण-डोंबिवली महानगर पालिका श्रेत्रामधील दुकानांसंदर्भात हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार उद्या (शुक्रवार, २० मार्च) सकाळपासून कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीतील जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, मेडीकल स्टोअर्स, रुग्णालय/क्लिनिक, भाजीपाला आदी दुकाने आणि आस्थापना वगळता इतर सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापना ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नक्की वाचा >> लॉक डाऊन म्हणजे काय? नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी २० मार्च सकाळी ११ वाजल्यापासून दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कल्याणमध्ये करोनाचे तीन रुग्ण अढळले आहेत.