राज्यात सध्या वाढत्या करोनामुळे सगळ्याच्याच चिंतेत भर पडताना दिसत आहे. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. करोना येणार हे 'अल्ला'ला २०११मध्ये समजलं होतं, त्यामुळे कब्रस्थानासाठी जागा मिळाली आणि कब्रस्थान बांधून पूर्णही झाले," असं विधान आव्हाड यांनी केलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुब्रामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ एखा कार्यक्रमात बोलत आहेत. त्यांनी या कार्यक्रमात हे विधान केलं असून, त्याच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काय म्हणाले आव्हाड? "करोनाच्या काळात जर आपल्याकडे हे कब्रस्थान नसते, तर शहराची काय परिस्थिती झाली असती, याची कल्पनाही करवत नाही. याचा विचार अल्लाने आधीच २०११ मध्ये करून ठेवला होता की, २०२० मध्ये करोना येणार आहे. आणि हा करोना येण्यापूर्वी येथे कब्रस्थान बनले पाहिजे, म्हणूनच येथे कब्रस्थानासाठी २०११मध्ये जमीन मिळाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थानाचे काम पूर्ण झाले," असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. राज्यातील परिस्थिती कशी? उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक सुरू राहणार आहे. दुसरीकडे विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही करोनाचा उद्रेक झाला असून, राज्य सरकार या तीन जिल्ह्यांत नाईट कर्फ्य लागू करण्याचा विचार करत आहे.