नवी मुंबईतील दीपक पाटील हत्या प्रकरण; सत्र न्यायालयात दाद मागणार ; सेनेला धक्का नवी मुंबईतील बांधकाम साहित्य पुरवठादार दीपक पाटील यांच्या हत्येप्रकरणी ठाणे महापालिकेतील नगरसेवक राजा गवारी याच्यासह सात जणांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राज्यातील विधानसभा निडवणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत राजा गवारी याने शिवसेनेत प्रवेश केला होता. महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपलेली असतानाच गवारीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या सर्व आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च नायालयात दाद मागण्याचे ठरविल्याचे सूत्रांनी सांगितले. नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांचे बंधू नगरसेवक देवीदास चौगुले यांची २००९ मध्ये हत्या झाली होती. या हत्येप्रकरणातील आरोपी दीपक पाटील हे संचित (पेरोल) रजेवर बाहेर आले होते. ४ जानेवारी २०११ रोजी दुपारच्या सुमारास पाटील हे मित्रांसह ठाणे न्यायालयातून घरी जात होते. त्या वेळी त्यांच्या मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची गाडी विटावा सब-वेजवळ अडविली. त्यानंतर मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवून आणि गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल ४५ दिवसांनंतर राजा गवारी (३८), अतुल ऊर्फ बाटली देशमुख (३४), रविचंद ऊर्फ रजा ठाकूर (३१), जयदीप साळवी (३५), सुजित सुतार (३५), सुजित उर्फ बत्र्या न्यायनिर्गुणे (३४) आणि नितीन वैती (३५) या सात जणांना मुंबई-गोवा महामार्गावर अटक केली होती. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू होता. ठाण्यात गाजलेल्या या खटल्यात सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी तब्बल दोन डझन साक्षीदार तपासले. न्यायालयात सादर करण्यात आलेले साक्षी पुरावे ग्राह्य़ मानून न्यायधीश भैसारे यांनी गवारी याच्यासह सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, गवारीला अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले आहे, तर उर्वरित सहा जणांची कल्याणच्या आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.