१२ जातीच्या तांदळाचे लागवड केंद्र; उत्पन्नवाढीसही मदत बदलापूर : पारंपरिक भातशेतीला नावीण्याची जोड देत गेल्या काही वर्षांत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यातच काळा आणि लाल तांदळामुळे भाताला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली असतानाच अंबरनाथ तालुक्यात निळ्या तांदळाची लागवड केली जाते आहे. आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या तांदळाचा बाजारभाव अधिक असून देशातील आसाम राज्यात याचे उत्पादन अधिक घेतले जाते. या तांदळाच्या लागवडीच्या प्रयोगासह तालुक्यात १२ जातींच्या तांदळाचे केंद्र तयार केले जात आहे. तांदळाच्या नवनव्या जाती विकसित करून त्याची लागवड केल्याचा प्रयोग यशस्वी केल्याचे गेल्या काही दिवसांत समोर आले आहे. मात्र नवनव्या जातींसह बाजारांमध्ये भाव खाणाऱ्या विविध रंगांच्या भाताची लागवड करून तालुक्यातील शेतकऱ्यांना जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयोग अंबरनाथ तालुक्यात राज्याच्या कृषी विभागातर्फे केला जात आहे. गेल्या महिन्यात अंबरनाथ तालुक्यातील विविध गावांमध्ये काळा आणि लाल रंगाच्या तांदळाची लागवड कृषी विभागाच्या मदतीने सुरू केली होती. काळ्या आणि लाल तांदळानंतर आता आसाम राज्यात लागवड केला जाणारा निळा तांदूळही लावला जात आहे. अंबरनाथ तालुक्यातील येवे गावात दहा शेतकऱ्यांनी प्रायोगिक स्तरावर या निळ्या तांदळाची खरीप हंगामात लागवड करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील १० हेक्टर क्षेत्रावर नुकतीच काळ्या तांदळाची लावगड केली गेली. त्याचप्रमाणे त्याच जातकुळीतील औषधी गुणधर्म असलेल्या आणि चांगला बाजारभाव असलेल्या निळ्या तांदळाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतल्याचे उल्हासनगर तालुका कृषी अधिकारी विठ्ठल बांबळे यांनी सांगितले आहे. आरोग्यासाठी उपयुक्त काळा, लाल आणि निळ्या भातामध्ये पोषक तत्त्वे भरपूर असतात. यातील एंथोसायनिन तत्त्व रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी मदत करते. या भातामध्ये तंतुमय पदार्थ, लोह, तांबे सर्वसामान्य पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त असल्याने हा तांदूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. लाल, काळ्या आणि निळ्या भातासोबतच विविध प्रकारच्या १२ भातांच्या जातीच्या लागवडीचा ‘कॅफेटेरिया’ अंबरनाथ तालुक्यात तयार केला गेला आहे. विविध भाताच्या जातींचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा उद्देश आहे. - सचिन तोरवे, कृषी साहाय्यक, अंबरनाथ.