धोकादायक इमारतींमधील रहिवाशांची व्यथा

ठाण्यातील ‘बी केबिन’ परिसरातील ‘कृष्णा निवास’ ही तीन मजली इमारत कोसळल्याच्या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन कुटुंबांतील नऊ जणांसह १२ जणांचे बळी घेणारी ही इमारत दुर्घटना खरे तर प्रशासकीय यंत्रणेसाठी धडा असायला हवा होता. ४०-५० वर्षांपूर्वी बांधलेल्या ठाण्यातील अधिकृत इमारती आज धोकादायक अवस्थेत आहेत. पण या इमारतींमध्ये राहणाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाने नेहमीच डोळेझाक केली. ‘कृष्णा निवास’ कोसळल्यानंतर तरी हे दुर्लक्ष संपेल, अशी या अधिकृत पण धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना आशा होती. मात्र, गेल्या दोन वर्षांतले चित्र पाहता, प्रशासनाच्या आंधळेपणात बदल झाला नसल्याचेच दिसून येते. महापालिका क्षेत्रात बहुसंख्येने असलेल्या अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजनेद्वारे जादा चटई क्षेत्राची खिरापत देणाऱ्या शासनाने अधिकृत इमारतींच्या विकासाविषयी मात्र आडमुठी भूमिका घेतली आहे.

नौपाडा, पाचपाखाडी, चरई, चेंदणी कोळीवाडा आदी वसाहतींनी ओळखल्या जाणाऱ्या जुन्या ठाण्यातच सर्वाधिक अधिकृत रहिवासी राहतात. चार-पाच दशकांपूर्वी बांधलेल्या आणि कालपरत्वे मोडकळीस आलेल्या येथील अनेक इमारती आता धोकादायक ठरू लागल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी ‘कृष्णा निवास’ इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही रहिवाशांना जीव गमवावा लागला. त्यानंतर अशा प्रकारे धोकादायक ठरलेल्या इमारतींमधील कुटुंबांना बाहेर काढून पालिका प्रशासनाने त्यांची रवानगी भाडे तत्त्वावरील घरांमध्ये (रेंटल हाऊसिंग) केली. मात्र धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाविषयी कोणताही कालबद्ध कार्यक्रम नसल्याने किती काळ रेंटल हाऊसिंगमधील असुविधा सहन करायच्या या रहिवाशांच्या प्रश्नाला सध्या तरी कोणतेही उत्तर नाही. दुसरीकडे भाडेकरू स्थलांतरित झाल्याने अनेक इमारत मालकांच्या दृष्टिकोनातून सुंठीवाचून खोकला गेला आहे. धोकादायक इमारतींतील घरे सोडलेल्या अनेक भाडेकरूंकडे हमीपत्रे नाहीत आणि मालकाने किती काळात इमारत पुनर्विकसित करावी, याबाबत कोणतेही निश्चित धोरण नाही. ‘साईराज’मधील रहिवाशांना हक्काची घरे मिळायला एक तप जावे लागले. आम्हाला किती वर्षे लागणार, असा अधिकृत स्थलांतरितांचा सवाल आहे. नव्या ठाण्यात सुविधांच्या पायघडय़ा पसरणाऱ्या शासन आणि प्रशासनाने जुन्या ठाण्याच्या जीर्णोद्धाराकडेही संवेदनशीलतेने पाहावे, अशी येथील रहिवाशांची किमान अपेक्षा आहे.