दशक्रिया घाट उभारण्याचा प्रस्ताव नागरिकांच्या विरोधानंतर रद्द ठाणे : उपवन येथील तलावालगत बुरुज आणि दशक्रिया विधी घाट उभारण्याचा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या आग्रहामुळे आखलेला प्रकल्प नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे अखेर ठाणे महापालिकेने गुंडाळला. दशक्रिया विधी घाट वगळून या भागात उर्वरित कामे करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत. ठाण्यातील येऊर जंगलाच्या पायथ्याशी उपवन तलाव आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या तलावाच्या भोवताली दररोज शेकडो ठाणेकर फेरफटका मारण्यासाठी येतात. सुशोभीकरणासाठी महापालिकेकडून विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उपवन तलावात तरंगता मंच बांधणे, तलवाजवळील मोकळ्या जागेत जिमखाना बांधणे आणि तलावाशेजारीच बुरूज आणि दशक्रिया घाट बांधणे अशी कामे करण्याचा प्रस्ताव डिसेंबरमध्ये मांडण्यात आला होता. शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे या कामांची मागणी केली होती. त्याआधारे महापालिकेने तीन वेगवेगळे प्रस्ताव तयार केले होते. मात्र दशक्रिया विधींमुळे परिसराच्या सौंदर्याला आणि स्वच्छतेला बाधा येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दशक्रिया घाट बांधण्याच्या प्रस्तावास विरोध केला होता. शिवसेनेचे काही नगरसेवकही या प्रस्तावास दबक्या सुरात विरोध करत होते. मात्र, खुद्द आमदार यासाठी आग्रही असल्याने सत्ताधारी पक्षाच्या एकाही नगरसेवकाने सर्वसाधारण सभेत उघडपणे याविरोधात भूमिका घेतली नव्हती. त्यानंतर हा प्रस्ताव चर्चेअंती मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, दशक्रिया विधी घाट बांधण्यास होत असलेल्या विरोधापुढे महापालिका प्रशासन अखेर नमले असून दशक्रिया घाट वगळून उर्वरित कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अभियांत्रिकी विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दशक्रिया विधी घाट वगळून उर्वरित कामे करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यासंदर्भात लेखी टिपण तयार करून पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर विभागाचे कार्यकारी अभियंता हणमंत येमलवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. उपवन तलावाजवळ काम करू नये अशा कोणत्याही सूचना अद्याप जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या नाहीत. तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि नागरिकांकरिता ही कामे करण्यात येत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. निर्माल्य, कचऱ्यामुळे अस्वच्छता सद्य:स्थितीत उपवन तलावालगत असा कोणताही घाट नसतानाही अनेक नागरिक तिथे दशक्रिया विधी करतात. हा विधी करताना तिथे मोठय़ा प्रमाणात केस, निर्माल्य आणि कचरा टाकला जातो. व्यायामासाठी येणाऱ्यांमध्ये याविषयी नाराजी आहे. या विधींमुळे तलाव दूषित होत असून, परिसराच्या सौंदर्यातही बाधा येत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.