प्राचीन इतिहासाचे अभ्यासक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्राचार्य डॉ. दाऊद दळवी (७९) यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे. प्राचीन इतिहास या विषयात डॉक्टरेट मिळविलेले प्रा. दळवी १९६१ मध्ये मुंबईतील पार्ले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर १९६५ ते १९८६ याकाळात मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात ते कार्यरत होते. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्त्व अभ्यासमंडळाचे ते सदस्यही होते. १९८६ ते १९९८ याकाळात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. आयडियल एज्युकेशन सोसायटी, कोकण इतिहास मंडळ, समर्थ भारत व्यासपीठ आदी संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. ‘मराठी ग्रंथ संग्रहालय-ठाणे'चे ते विश्वस्त होते. याशिवाय इन्स्टिटय़ूट ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज्, इंडियन हिस्ट्री अॅन्ड कल्चरल सोसायटी आदी संस्थांचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘लेणी महाराष्ट्राची' हे त्यांचे पुस्तक अत्यंत गाजले. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीही प्रसिद्ध झाली. याशिवाय मुस्लिम स्थापत्यकला, असे घडले ठाणे आदी पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. स्थानिक इतिहासाच्या अभ्यासावर त्यांनी विशेष भर दिला. राष्ट्रपती झाकीर हुसेन राष्ट्रीय पुरस्कार, ठाणे भूषण, जनकवी पी. सावळाराम आदी पुरस्कारही त्यांना लाभले. परिसरातील ऐतिहासिक दस्तऐवज संग्रहीत करण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ास स्वतंत्र वस्तुसंग्रहालय व्हावे, यासाठी ते अखेपर्यंत प्रयत्न करीत होते.