नगरविकास आणि समाज कल्याण विभागाकडे महापालिकेचा प्रस्ताव भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या सफाईचा ठेक्यावरून पालिका आणि वाल्मिकी समाज यांच्यात सुरू असलेला वाद दूर करण्यासाठी पालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास व समाज कल्याण विभागाला सफाई कामगार आयोगाच्या शिफारसीनुसार प्रस्ताव पाठवून निर्णय घेण्याची विनंती केली आहे. मीरा—भाईंदर महानगरपालिकेमार्फम्त शहरातील विविध भागांत सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे.या शौचालयाच्या सफाईचे काम पूर्वी वाल्मिकी समाजातील नागरिकांकडून करण्यात येत होते. मात्र आता या सफाई करण्यासाठी वार्षिक तीन कोटी व देखभाल दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षांंसाठी १८ कोटी रुपयांचा ठेका मे.शाईन मेन्टेनन्स सव्र्हिसेस या एकाच कंपनीला देण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ३ नोव्हेंबर रोजी ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला आहे. मात्र, हा ठेका नियमबा पद्धतीने देण्यात आला असल्याचा आरोप वाल्मिकी समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच पालिकेकडून शौचालय सफाईचा देण्यात आलेला ठेका रद्द करत वाल्मिकी समाजातील जास्तीत जास्त संस्थांना प्रत्येकी १५ ते २० शौचालय सफाईसाठी देण्यात यावे यासाठी वाल्मिकी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्य सफाई आयोगाने राज्य शासनाच्या नगररचना व समाजकल्याण विभागाला केलेल्या शिफारसीनुसार प्रस्ताव पाठवून निर्णय घेण्याची विनंती पालिकेने केली आहे. शासनाने प्रस्ताव मान्य केल्यानंतर शिफारसीबाबत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या शहरातील शौचालय सफाईचे काम करण्यासाठी देण्यात आलेल्या ठेकेदाराकडेदेखील वाल्मिकी समाजातील कामगार काम करत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी दिली.