परंपरा संवर्धनासाठी ज्येष्ठ नागरिकांचा पुढाकार भाईंदर: आगरी समाजातील लग्न सोहळ्यात अत्यावश्यक मानली जाणारी पारंपरिक ‘धवला’ गाणी काळानुसार लुप्त पावत चालली आहे. त्यामुळे धवला गाणाऱ्या धवलारीण महिला उपलब्ध होत नसल्यामुळे या संस्कृतीला जपण्याकरिता आगरी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ात प्रामुख्याने आगरी समाज वसलेला आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या आगरी समाजाच्या पिढय़ानुपिढय़ा चालत आलेल्या काही पारंपरिक लोकगीतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लग्न सोहळ्यात प्रामुख्याने गायली जाणारी ‘धवला’ गाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. या गाण्यांखेरीज आगरी लग्न सोहळे अपुरे असल्याची सांगता आहे. मात्र गेल्या काही काळापासून या आगरी पट्टय़ात झपाटय़ाने वाढलेल्या शहरीकरणामुळे ही संस्कृती लुप्त पावत चालली आहे. धवला गाणी गाणाऱ्या महिला या साधारण ऐंशी वयोगटातील आहेत. त्यामुळे नव्या धवलाईनी या परंपरेकडे पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच कोणत्याही लिखित स्वरूपात नसलेली ही ‘धवला’ गाणी संस्कृती लुप्त होत असून येणाऱ्या पिढीला पाहणे कठीण होणार आहे. त्यामुळे या पारंपरिक संस्कृतीला जपण्याकरिता मीरा-भाईंदर शहरातील ज्येष्ठ महिलांनी पुढाकार घेतला असून ही संस्कृती जपण्याचे आगरी समाजाला आवाहन केले आहे. संस्कृती लुप्त होण्याचे कारण आगरी समाजातील लग्न सोहळ्यात गायली जाणारी ‘धवला’ गाणी ही कोणत्याही लिखित स्वरूपात नसून केवळ मौखिक स्वरूपात आहे. तसेच, आगरी समाज राहत असलेल्या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे येथील महिला पारंपरिक गाण्याकडे कमीपणा वाटतो म्हणून पाठ फिरवत आहेत. मात्र ‘धवला’ गाणी आपल्या संस्कृतीचा भाग असून त्याद्वारे उत्पन्नाची संधीदेखील उपलब्ध होऊ शकते अशी जनजागृती आगरी समाजातील ज्येष्ठ महिलांकडून करण्यात येत आहेत. आगरी लोकगीते व धवला गाण्यांना जिवंत ठेवण्याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच याकरिता मी पुस्तकाची रचनादेखील केली आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी या संस्कृतीला जपण्याकरिता पुढाकार घ्यावा म्हणून जनजागृती करत आहोत. - प्रभात पाटील, ज्येष्ठ शिक्षिका