उल्हासनगरातील इमारतींना संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे आदेश

उल्हासनगर : मे महिन्यात दोन आठवड्यांच्या अंतराने दोन इमारतींचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर १९९४ ते १९९८ या काळात उभारलेल्या इमारतींचा शोध घेण्याचे काम उल्हासनगर महापालिकेने सुरू केले. चारही प्रभाग समिती क्षेत्रात केलेल्या सर्वेक्षणात सात दिवसांत १९९४ ते १९९८ या कालावधीत बांधलेल्या ५५० इमारती असल्याचे आढळून आले आहे. यात सर्वाधिक १६० इमारती प्रभाग समिती चारच्या क्षेत्रात आढळून आल्या आहेत. या इमारतींना संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या इमारतींची बांधणी उलवा प्रकारच्या निकृष्ट वाळू वापरून झाली असून यातील बहुतांश इमारतींवर कारवाई करत त्याचे स्लॅब पाडण्यात आले होते.

उल्हासनगर शहरात १९९० ते १९९२ या काळात मोठ्या प्रमाणावर इमारती उभ्या राहिल्या. त्यातील बहुतांश इमारती अनधिकृतपणे उभारल्या गेल्या. यात विशेषत: उलवा प्रकारातील निकृष्ट दर्जाच्या वाळूचा वापर करण्यात आला होता. अशा अनेक अनधिकृत इमारतींवर उल्हासनगर महापालिकेने कारवाई करत इमारतीचे स्लॅब तोडले होते. काही बांधकाम व्यावसायिकांनी हे स्लॅब पुन्हा जोडून त्याचा वापर सुरू केला. यातील दोन इमारतींचे स्लॅब मे महिन्यात कोसळून १२ जणांना आपला जीव गमवावा लागला. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील अशा इमारती शोधण्याचे आदेश दिले होते. उल्हासनगर महापालिकेने या इमारतींना शोधण्यासाठी चार प्रभाग समिती क्षेत्रानुसार चार पथके तयार केली होती. त्यात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश होता. या समितीने २९ मेपासून शहरात सर्वेक्षण सुरू केले होते. सात दिवसांच्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच उल्हासनगर महापालिकेने जाहीर केला असून त्यात ५५० इमारती शोधण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. या इमारतींची यादी http://www.umc.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग समिती कार्यालय एकमध्ये ९४ इमारती आढळून आल्या असून प्रभाग समिती कार्यालय दोनमध्ये १३३ इमारती आहेत. प्रभाग समिती कार्यालय तीनच्या क्षेत्रात ११८ इमारती सर्वेक्षणात आढळून आल्या आहेत. तर प्रभाग समिती कार्यालय चारच्या क्षेत्रात सर्वाधिक १६० इमारती आढळल्या आहेत.

हे सर्वेक्षण सुरूच असून त्यातील पहिल्या आठवड्याची माहिती जाहीर करण्यात आल्याचे पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे यांनी दिली आहे. या इमारतींची स्थळपाहणी करून येथील नागरिकांच्या तात्पुरत्या स्वरूपातल्या पुनर्वसनासाठी पालिकेने शाळा, समाज मंदिर आणि सभागृहांची पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अर्हताधारक तज्ज्ञ संरचनात्मक अभियंत्यांकडून इमारतीचे लेखापरीक्षण करण्याचे आवाहनही डॉ. भदाणे यांनी केले आहे.