वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता त्यांना रस्त्यांच्या कामामुळे अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्याचा सामना करावा लागत आहे. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पुलाचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून वाहनचालकनियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आले आहे.डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटी आणि नया सवेरा संस्थेच्या वतीने नुकतेच येथील वाहतूक व्यवस्थेचे सर्वेक्षण करण्यात आले. नांदिवली पुलाचे काम सुरू असल्याने गांधीनगर, पी अॅण्ड टी कॉलनी, नांदिवली गाव आदी परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. ही वाहतूक रामचंद्रनगर परिसरातून तरटे प्लाझासमोरील रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. हा रस्ता चिंचोळा असल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथून एकेरी वाहतूक सुरू करावी, तसेच पर्यायी रस्त्याची सोय करावी यासाठी संस्थेच्या सभासदांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला १५ दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार चर्चा होऊन एकेरी वाहतूक निर्देशक फलक येथे लावण्यात आले. मात्र या फलकांकडे दुर्लक्ष करून सर्रास नियम मोडून एकाच रस्त्यावरून ये-जा करीत असल्याने या व्यवस्थेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. शनिवारी सायंकाळच्या वेळेस संस्थेच्या सभासदांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची नोंदणी केली व त्या वाहनचालकांस पुष्पगुच्छ देऊन त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. एका तासात सुमारे एक हजारहून अधिक वाहनचालकांची नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याचे वुमन्स वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. स्वाती गाडगीळ यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे यात सुशिक्षित व उच्चभ्रू लोकांची संख्या जास्त आढळून येते, असेही त्या ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.