डोंबिवलीतील लहानग्यांना विविध उपक्रमांचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले बालभवन ऐन उन्हाळ्याच्या सुटीत रितेरिते आहे. या बालभवनात काही ठरावीक व्यावसायिक उपक्रमांशिवाय यंदाच्या सुट्टीत महापालिकेच्या वतीने कोणत्याही उपक्रमाचे आयोजन केलेले नाही. गेल्यावर्षी निवडणुकांचे कारण पुढे करत ऐन सुट्टीच्या दिवसांत बालभवन बंद ठेवण्यात आले होते. यावर्षी ते सुरू असूनही केवळ व्यावसायिक उपक्रम येथे सुरू आहेत. शहरातील शाळा, संस्थांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यक्रम होत नाहीत, असे प्रशासनाचे त्यावर म्हणणे आहे. डोंबिवलीतील लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तब्बल सहा कोटी रुपयांचा खर्च करून २०१० साली बालभवनची प्रशस्त वास्तू बांधली. मात्र शुभारंभाच्या दिवसापासून या ठिकाणी विविध बालउपयोगी उपक्रम राबविण्यात महापालिका प्रशासनाला पुरेसे यश आलेले नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसामध्ये तरी महापालिकेने काही संस्थांना हाताशी धरून बालकांसाठी उपक्रम राबवावे अशी पालकांची इच्छा आहे. मात्र त्यासाठी महापालिकेमार्फत पुढाकार घेतला जात नसल्याने पालकवर्गात नाराजीचे वातावरण आहे. या बालभवनमध्ये लहान मुलांसाठी काही व्यावसायिक शिबिरे भरविण्यात येतात. मात्र, त्याचे शुल्क सर्वानाच परवडत नाही. शिवाय महापालिकेमार्फत या ठिकाणी उपक्रम, शिबिरे भरवली जातील असे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यावरही काही कारवाई होताना दिसत नाही. ना नफा ना तोटा या तत्त्वावर बालकांसाठी संस्थांनी विविध उपक्रम येथे राबवावेत असा मुख्य उद्देश या बालभवन उभारणीमागे आहे. परंतु शाळा व संस्थांचा प्रतिसाद पहिल्यापासून आम्हाला मिळाला नाही. काही व्यावसायिक संस्थांचे येथे उपक्रम गेले वर्षभर सुरू आहेत. यंदाच्या सुट्टीत या उपक्रमांतील मुलांची संख्या वाढली आहे. तसेच बालभवनच्या ग्रंथालयातील सभासद मुलांची संख्या यंदा वाढली ही उल्लेखनीय बाब आहे, असा दावा महापालिकेमार्फत केला जात आहे. पूर्वी ६० सभासद असलेल्या या ग्रंथालयात आता ११५ सभासद आहेत. सुमारे तीन हजार पुस्तकांचा संग्रह या ग्रंथालयात असून मुलांनी या पुस्तकांचा उपभोग घ्यावा. तसेच संस्थांनीही बालभवनच्या वास्तूचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आम्ही वारंवार आवाहन करीत आहोत. परंतु आम्हाला प्रतिसादच मिळत नसल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई, दिल्ली, राजकोट येथे असलेले बालभवन हे सरकारच्या वतीने चालविण्यात येते. तेथील कर्मचाऱ्यांचा पगाराचा तसेच बालभवन देखभाल दुरुस्तीचा सर्व खर्च सरकारच्या वतीने करण्यात येत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद लाभतो. मात्र पालिकेच्या सूचीत अशी कोणतीही पदे नाहीत किंवा उपाययोजना नाहीत. शाळा व संस्थांचा प्रतिसाद मिळावा यासाठी तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर हे बालभवन चालविण्यासाठी द्यावे. वीज, पाणी बिल पालिकेच्या वतीने भरावे, इतर देखभाल दुरुस्तीचा खर्च संस्थांनी करावा अशा स्वरूपाचा प्रस्तावही पालिकेकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने बालभवनाला ऊर्जितावस्था मिळत नसल्याचे चित्र आहे. व्यावसायिक उपक्रमही हातघाईला व्यावसायिक उपक्रमांच्या माध्यमातून येथे सध्या, कराटे प्रशिक्षण, नृत्य व बुद्धिबळ असे मोजकेच उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांना मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परंतु काही संस्थांनी मे महिन्यात मुलांचा प्रतिसाद कमी असल्याने व पालिकेला उत्पन्नातील ३५ टक्के कर द्यावा लागत असल्याचे कारण पुढे करून तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. काही संस्थांनी खर्च परवडत नसल्याची सबब पुढे करत उपक्रम बंद ठेवले आहेत.