कल्याण- डोंबिवली पालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी शहर परिसरात विकासाची कामे धडाक्याने हाती घेतली आहेत. पालिकेतील निविदेतील साखळी पद्धत मोडून काढली आहे. रवींद्रन यांच्या कामावर खूश झालेल्या शहरवासीयांना काही व्यापारी, राजकीय मंडळी आयुक्तांची शासनस्तरावर बदली करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची कुणकुण लागली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी कोणत्याही परिस्थितीत शासनाने आयुक्तांची बदली करू नये, यासाठी रेल्वे स्थानक परिसर, शहराच्या विविध भागात सह्यांची मोहीम सुरू केली आहे. आयुक्तांनी आपली बदली होणार नाही, असे स्पष्टीकरण दिले असले तरी रहिवासी त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. त्यामुळे कल्याणसह महापालिकेच्या परिसरातील नागरिकांनी आयुक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरविले आहे.