पुस्तकातील भाषा ही शब्दांच्या पलीकडची असते. त्यातील भावना या सर्वसमावेशक असतात. वडील प्राध्यापक व आई शिक्षिका असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते. साहजिकच लहानपणीच पुस्तकांचा सहवास लाभला. वाचनसंस्कृतीचा शालेय वयातच परिचय झाला. माझे मूळ गाव वर्धा. साहजिकच तिथे विनोबा भावेंच्या विचारसरणीचा जबरदस्त पगडा आहे. शाळेत आमच्याकडून त्यांची गीताई पठण करून घेतली जात होती. त्यामुळे लहानपणीच विनोबाजींची गीतेवरील प्रवचने मला पाठ होती. अशा रीतीने वाचनाचा श्रीगणेशा लहानपणीच झाला असला तरी खऱ्या अर्थाने माझे वाचन लग्नानंतरच सुरू झाले. महात्मा गांधी यांचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे मी संपूर्ण वाचलेले पहिले पुस्तक. माझ्या पतींना वाचनाची खूप आवड असल्यामुळे आपोआपच मीसुद्धा उत्तमोत्तम पुस्तके वाचू लागले. अर्थात अमुक एका विषयापुरते मी माझे वाचन मर्यादित ठेवलेले नाही. मी चौफेर वाचते. कोणताही विषय वज्र्य मानत नाही. तसेच ललित लेख, चरित्रात्मक, आत्मचरित्र, नाटकांवरील समीक्षणे, कादंबरी असे अनेक साहित्य प्रकार वाचते. त्यातील काही पुस्तकांचा माझ्यावर प्रभाव पडला. नीआले डोनाल्ड वाल्सच यांच्या ' कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’ या पुस्तकाने माझ्या विचारसरणीत बदल घडवून आणला. तसेच मी शिर्डीच्या साईबाबांची भक्त असल्याने मला त्यांच्याविषयी पुस्तके वाचायला आवडतात. मी ओशो, सद्गुरू वामनराव पै, गोंदवलेकर महाराज यांच्याशी निगडित असणारी अनेक आध्यात्मिक पुस्तके वाचलेली आहेत. तसेच ती माझ्या संग्रहातही आहेत. मला संगीताशी निगडित अनेक पुस्तके वाचायला आवडतात. अनेक संगीतकार, गायकांची चरित्रे, आत्मचरित्रे मी वाचली आहेत. काही गझलांची पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. माझ्या घरात पुस्तकांसाठी विशिष्ट अशी बुकशेल्फ आहे. या बुकशेल्फमध्ये मी त्या त्या पुस्तकाच्या प्रकारानुसार विशिष्ट सेक्शन करून ठेवलेल्या आहेत. सध्या माझ्या घरात दोन हजार पुस्तकांचा संग्रह आहे. कविवर्य शंकर वैद्य यांचं ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य अतिशय अर्थपूर्ण वाटतं. कारण ज्या वेळी आपण वाचत असतो, त्या वेळी आपल्याला आपल्या आयुष्याचं सार खऱ्या अर्थाने उमगतं. मी वाचनासाठी विशिष्ट असा वेळ काढत नाही. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी वाचन करते. प्रवासात असताना कारमध्ये वाचन करते. मला सकाळी वाचायला अधिक आवडतं. मी सोयीनुसार वाचन करते. एखादे पुस्तक अर्धे वाचले की ते तसेच ठेवून दुसरे पुस्तक हाती घेते. वाचलेल्या मुद्दय़ांचे मनात चिंतन, मनन सुरू असते. काही महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवते. लेखिका पुपुल जयकर यांनी लिहिलेलं आणि अशोक जैन यांनी अनुवादित केलेलं ‘इंदिरा’ नावाचं इंदिरा यांच्या आयुष्यावरील पुस्तक वाचून माझ्या विचारसरणीतही बदल झाला. त्या केवळ एक उत्तम राजकारणी नव्हत्या तर एक आई, बायको, मुलगी, सून यांसारखी सर्व कौटुंबिक नाती त्यांनी समर्थपणे निभावली. मला अनेकांना पुस्तकं सजेस्ट करायला आवडतात. परंतु मी पुस्तक सजेस्ट करताना सकारात्मक पुस्तकं वाचण्यास सांगत असते. जेणेकरून सकारात्मक आशयाच्या पुस्तकातून आपल्या मनातही सकारात्मकता यावी हाच उदेश असतो. मला ‘शिव खेरा’ यांची अनेक सकारात्मक दृष्टिकोनावर आधारित पुस्तके वाचायला आवडतात. मी पुस्तकांना खूप मोठय़ा प्रमाणावर जपते. मी पुस्तकांवर जिवापाड प्रेम करते. माझे एखादे पुस्तक कुणी वाचनासाठी घेऊन गेले तर ते पुस्तक मी हक्काने मागून घेते. मला पुस्तकांच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा आवडत नाही. मी आजवर अनेक प्रकारची पुस्तके वाचलेली आहेत. ‘चिकन सूप फॉर द इंडियन सौल’ भारतीय रंगभूमी, जागतिक रंगभूमी, शेक्सपिअरची नाटके, पाश्चिमात्य रंगभूमीची वाटचाल, विजय तेंडुलकरांचं ‘नाटक आणि मी’ माधव वझे यांचे ‘रागमुद्रा’, कांचन घाणेकर यांचे ‘नाथ हा माझा’, विजया मेहता यांचे ‘झिम्मा’, विजय तेंडुलकर यांचे ‘हे सर्व कुठून येते’सारखे ललित लेख. विनिता कामटे यांचे ‘टू द लास्ट बुलेट’ , धीरूभाई अंबानी, शरद पवार यांची आत्मचरित्रे, डॉ. विनय वाईकर यांची ‘आईना- ए- गझल’, शिरीष कणेकर यांचे ‘गाये चला जा’, तसेच एक होता काव्र्हर , मिलिंद बोकील यांची ‘शाळा’ ही कादंबरी, माधुरी पुरंदरे यांचे वाचू आनंदे, प्रिया तेंडुलकरांची पुस्तके, अनिल अवचटांचे ‘माणसं’, मौन- एक उत्सव, प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा यांसारखी अनेक पुस्तके वाचलेली आहेत. तसेच निरनिराळ्या कविता, लेख, संवादशास्त्र, नाटकांची समीक्षणे, तमाशाप्रधान पुस्तक, शेरोशायऱ्या यांच्यावर आधारित अनेक पुस्तके मी वाचलेली आहेत . बालरंगभूमीविषयी ‘पीएच.डी.’चा अभ्यास करताना मला अनेक प्रकारचे साहित्य वाचावे लागले व त्याचा फायदाही मला होत असतो. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचायला मला अधिक आवडतं. कारण त्याची जुनाट झालेली पिवळी जीर्ण पाने ही खूप अर्थ सांगत असतात. शब्दांकन- ऋषीकेश मुळे