डोंबिवलीतील गटारसफाईमुळे नागरिकांचे नाक मुठीत पावसाळ्यात नाले तुंबू नयेत, यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये लहान-मोठय़ा गटारांचा गाळ उपसण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. स्थानिक मजूर संस्थांकडून ही कामे करण्यात येत असून अनेक ठिकाणी गटरांतील गाळ उपसून तो रस्त्याच्या कडेला ठेवला जात आहे. हा गाळ सुकल्यानंतरही तो उचलण्याची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली नसल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दरुगधी पसरली असून आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्र नगर प्रभागात गेल्या पाच दिवसांपूर्वी गटारातील गाळ रस्त्याच्या कडेला काढून ठेवण्यात आला आहे. तो उचलण्यात आला नसल्याने तो गाळ रस्त्यावर पसरला आहे. अवजड वाहने या रस्त्यावरून जात असल्याने तो गाळ रस्त्यावर इतस्त: पसरला आहे. महाराष्ट्र नगरमधील बहुतांशी भाग चाळींचा आहे. चाळीत राहत असलेल्या रहिवाशांच्या घरासमोरून गटारे गेली आहेत. गटारातून काढलेला गाळ न उचलता तेथेच पडून राहत असल्याने रहिवाशांना दरुगधीचा त्रास सहन करावा लागतो, असे पांडुरंग रसाळ यांनी सांगितले. गटारातील गाळ कामगारांनी बाहेर काढल्यानंतर तो किमान त्याच किंवा दुसऱ्या दिवशी उचलून अन्यत्र टाकण्याची व्यवस्था पालिकेकडून होणे आवश्यक आहे. तशी कोणतीही व्यवस्था पालिकेकडून करण्यात आलेली नाही, याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गटार साफ करणारे कामगार नाल्यातील गाळ उपसून गटाराच्या कडेला ठेवतात. हा गाळ ओला असल्याने तो तातडीने अन्यत्र हलवता येत नाही. परंतु, अनेक ठिकाणी गाळ सुकून गेल्यानंतरही पालिकेकडून तो उचलण्याची व्यवस्था झालेली नाही. परिणामी या भागांत दरुगधी पसरली आहे. ‘अधिकाऱ्यांना कोण सांगणार?’ ‘गटारातील गाळ काढण्याची कामे दिल्यानंतर पालिकेने या कामगारांच्या सोबत गाळ उचलण्यासाठी पालिकेचे एक वाहन देणे आवश्यक होते. तातडीने गाळ उचलून तो कचराभूमीवर टाकता आला असता. तशी व्यवस्था न केल्याने गटारातील गाळ काढून काहीही उपयोग होत नाही. काढलेला गाळ पुन्हा गटारात किंवा रस्त्यावर पसरत आहे. अर्थात, करदात्यांचा पैसा गटारात, गाळात घालण्याची सवय जडलेल्या अधिकाऱ्यांना आता हे सगळे वारंवार कोण सांगणार’, असा प्रश्न नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केला आहे.