अवघ्या जगाला हादरवणारे पहिले महायुद्ध घडले तेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेल्या भारतात स्वातंत्र्यसमर सुरू होते. मात्र, तरीही अनेक भारतीय जवानांनी ब्रिटिश फौजेमधून या महायुद्धात सहभाग घेऊन आपल्या शौर्याचे दर्शन घडवले होते. या महायुद्धाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या भारतीय जवानांना स्मृतिवंदना देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दिल्लीत एक चित्रसंग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयात देशभरातून निवडलेल्या ११ चित्रकारांच्या चित्रांचा समावेश असून त्यात ठाण्यातील चित्रकार डग्लस जॉन यांचीही दोन चित्रे आहेत. जगाचे राजकारण आणि अर्थकारण बदलणाऱ्या पहिल्या महायुद्धात भारतीय जवानही सहभागी झाले होते. यापैकी अनेक ज्ञात-अज्ञात जवानांनी परकीय भूमीवर शौर्य गाजवत वीरमरण पत्करले. अशाच ज्ञात जवानांच्या शौर्याची गाथा सांगणारे प्रसंग चित्रांतून दर्शवण्यासाठी दिल्लीमध्ये एक चित्रसंग्रहालय उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी घेतलेल्या एका विशेष कार्यशाळेतून देशभरातील ११ चित्रकारांची निवड करण्यात आली. यामध्ये ठाण्यात राहणारे डग्लस जॉन यांचाही समावेश आहे. डग्लस यांची दोन चित्रे या संग्रहालयासाठी निवडण्यात आली आहेत. जर्मनीच्या सीमेवर आपल्या तुकडीतील जायबंद सैनिकांना परत आणण्यासाठी रायफलमन कुलबीर थापा यांनी दाखवलेल्या धैर्याचे दर्शन घडवणारे चित्र जॉन यांनी काढले आहे, तर दुसरे चित्र गुरखा रेजिमेंटच्या जवानांच्या शत्रूसोबतच्या समोरासमोरील लढाईचे आहे. गुरखा रेजिमेंटमधील रायफलमॅन असलेले कुलबीर थापा यांची नियुक्ती जर्मन सीमेवर होती. यावेळी झालेल्या चकमकीत त्यांच्या तुकडीचे काही सैनिक जर्मनीच्या बाजूला जखमी अवस्थेत पडले होते. अशा वेळी जिवाची पर्वा न करता थापा यांनी पहाटेच्या धुक्यामध्ये शत्रुपक्षाच्या बाजूला घुसून तेथून आपल्या सैनिकांना बाहेर उचलून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही धडपड पाहून जर्मन सैनिकांनीही टाळय़ा वाजवून त्यांचे कौतुक केले. पहिल्या महायुद्धात गुरखा रेजिमेंटच्या सैनिकांची शत्रुपक्षाशी समोरासमोर गाठ पडली. तेव्हा तुंबळ युद्ध झाले. युद्धाचे वर्णन आणि सैनिकाची जुनी छायाचित्रे या आधारावर जॉन यांनी ही चित्रे हुबेहूब रेखाटली आहेत. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड मूळचे सोलापूरचे असलेले डग्लस जॉन यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यांचे वडील संस्कृत आणि नक्षत्रांचे अभ्यासक असल्याने जॉन यांची अल्पवयातच रामायण, महाभारत या महाकाव्यांशी ओळख झाली. चित्रकलेच्या हौशीतून त्यांनी या महाकाव्यांतील घटना व व्यक्तिरेखांची चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. पुढे मुंबईत त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी मुंबईचे दैनंदिन जीवन दर्शवणारी अनेक चित्रे यांनी काढली. या चित्रांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूलमध्येच प्राध्यापक म्हणून काम सुरू केले.