अमली पदार्थाच्या तस्करीला लगाम लागावा यासाठी गेल्या तीन वर्षांत कोटय़वधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले असून कारवाईत दीडशेहून अधिक तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

२०१७ च्या सुरुवातीलाच अंबरनाथ येथील एका कंपनीतून पोलिसांनी शेकडो किलो अमली पदार्थ जप्त करून १९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा माल जप्त केला. येत्या महिन्याभरात ही कारवाई अधिकाधिक तीव्र करण्यात येईल, असे अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिसांनी सांगितले. बाजारात औषधांच्या गोळ्यांची आणि नाकाद्वारे ओढण्याच्या पावडरची सर्वाधिक विक्री होत असून गेल्या दोन वर्षांत केलेल्या कारवाईत गांजा, हेरॉईन, एमडी पावडर, चरस हे अमली पदार्थ सर्वाधिक जप्त करण्यात आले आहेत.

२०१५ ला पोलिसांनी ४२ लाख २६ हजार १७८ रुपयांचा माल जप्त केला, तर ९८ आरोपींना अटक करण्यात आली. २०१६ मध्येही मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. या वर्षी एकूण ६० जणांना अटक केली तसेच २ हजार दोन कोटी ६२ लाख ४६ हजार ३०४ रुपयांचा साठा जप्त केला. २०१७ च्या सुरुवातीलाच चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १९ कोटी ३० हजार ५७० रुपयांचा माल जप्त केला.