* आवक घटल्याने दरांची उसळी * गेल्या वर्षीच्या तुलनेने १०० ते १५० रुपयांची वाढ मत्स्यदुष्काळामुळे ताजी मासळी खाणे खिशाला जड होत असतानाच आता सुक्या मासळीच्या दरांनीही उचल खाल्ली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुक्या मासळीच्या दरांत सरासरी शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी शेकडा ४०० रुपयांनी मिळणारे सुके बोंबील यंदा ५०० रुपये शेकडा मिळत आहेत. जवळा, करदी यांचे भावदेखील १०० रुपयांनी तर कोळंबीचे दर दीडशे रुपयांनी वाढले आहेत. पापलेट, सुरमई, बांगडा या माशांची आवक घटल्याने या प्रकारातील सुकी मासळी बाजारात उपलब्धच नाही. या साऱ्यामुळे अस्सल खवय्यांना मात्र, मासळी खाण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागत आहे. एप्रिल महिन्यात सर्वसाधारणपणे वसईच्या बाजारपेठेमध्ये सुक्या मासळीचे आगमन होते. गेल्या वर्षी सुक्या मासळीची आवक चांगली झाल्याने बाजारात दर कमी होते. मात्र, यंदा मत्स्यदुष्काळासारखी परिस्थिती असल्याने सुक्या मासळीची आवक घटली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचाही फटका सुक्या मासळीला बसला आहे. सुके बोंबील, जवळा, सुकट, कोलंबी आदी मासळी बाजारात उपलब्ध आहे, परंतु पापलेट, सुरमई, बांगडा या सांरखी मोठी सुकी मच्छी समुद्रातील ओल्या मच्छीच्या कमतरतेमुळे उपलब्ध होऊ शकली नाही, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षीचा दर यंदाचा दर बोंबील ४०० रु. शेकडा ५०० रु. शेकडा जवळा करंदी ३०० रु. किलो ४०० रु. किलो कोलंबी ४०० रु. किलो ५५० रु. किलो * सुकी मासळी ४०० ते ५०० रु. किलोच्या भावाने विक्री करण्यात येत आहे. परंतु मागणी कमी झाली नाही. * पापलेट, सुरमई, बांगडा, वाव, ढोंबेरी यांसारखी मोठी सुकी मासळी बाजारात उपलब्ध नाही.