कारागृह म्हटलं की बंदिस्त जग. इथे अपराधी मनाने जगाचा संपर्क तुटलेले कैदी येतात. यातील अनेक जण भयंकर अशा गुन्ह्यांतील आरोपी असतात. असं म्हणतात की, माणूस जन्मत: गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला कारणीभूत ठरते. पण मग योग्य आणि पोषक परिस्थिती मिळाली तर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो आणि अंगुली मालासारखा कुख्यात गुन्हेगार सुद्धा सरळमार्ग अवलंबू शकतो. त्याप्रमाणे अनेक वाईट कृत्य केलेला कैदी सुद्धा एक नवं आयुष्य जगण्याला प्रवृत्त होऊ शकतो. याच प्रेरणेतून ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना सुशिक्षित करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिथे गंभीर अशा अपराधांसाठी आपल स्वातंत्र्य गमावून बसलेले अनेक कैदी आहेत. या कैदयांना शिक्षित होण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. या उपक्रमाअंतर्गत मागील तेरा वर्षात कारागृहातील ७६ गुन्हेगार विद्यार्थी होऊन पदवीधर झाले आहेत. यातील काहींनी गांधी साहित्याचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळवले. अहिंसेच्या मार्गासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या गांधीजींच्या आत्मचरित्रातूनक्रूर कैदयानांही आयुष्याचा नवा अर्थ सापडला आहे. यंदा तर गांधीजींच्या विचार धारेवर आधारित परीक्षेत ठाणे कारागृहातील निकाल हा शंभर टक्के लागला आहे. इतकंच नव्हे तर कारागृहात सुरु झालेल्या योगाभ्यासात सुध्दा अनेक जण पारंगत झाले आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहात विविध अभिनव उपक्रम कैद्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने राबविले जातात. यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना विविध कामांचं प्रशिक्षण देवून त्यांना कारखान्यात काम दिलं जात. यातून सरकारला दरवर्षी करोडो रुपयांचं उत्पन्नही मिळतं याच जोडीला कैद्यांना शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार २००३ पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र याठिकाणी सुरु करण्यात आले. तेव्हापासून २०१६ पर्यंत तब्ब्ल ७६ कैद्यांनी कला आणि वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करून या दोन विभागात पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली. मागील वर्षी ६ कैद्यांनी कला शाखेतून पदवीची परीक्षा दिली होती. त्यातील त्यात सर्वांन यश आले. तर कला शाखेच्या पहिल्या वर्षाची ३२ कैद्यांनी परीक्षा दिली. त्यातील २८ जण उत्तीर्ण झाले. त्याच जोडीला कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाला ८ कैदी बसले होते, त्यातील ७ कैदी उत्तीर्ण झाले होते. यंदाच्या वर्षीही कला शाखेच्या पदवीची ४ कैद्यांनी परीक्षा दिली. या व्यतिरिक्त कला शाखेतूनच प्रथम वर्षाकरिता ९ आणि व्दितीय वर्षासाठी १२ कैद्यांनी परीक्षा दिली आहे.