किशोर कोकणे/आशिष धनगर

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने बकरी ईद निमित्ताने मार्गदर्शक सुचना जाहीर केल्यानंतर आता या बक ऱ्यांचा ठाणे, मुंबई जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात कमतरता निर्माण झाली आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून येणाऱ्या बकरे वाहून नेणाऱ्या शेकडो वाहने ठाणे जिल्ह्य़ाच्या जिल्ह्य़ाच्या वेशीवर दोन दिवसांपासून अडकून पडली आहेत. त्यामुळे बकरा बाजारात ४० ते ५० टक्के पुरवठा घटणार आहे. मार्गदर्शक सुचना जाहीर होण्यापूर्वी आणलेले बकरे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्त नव्याने बकरे येत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्याचा परिणाम किमतीवर होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने बकरी ईद निमित्ताने होणारी गर्दी रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये मुस्लिम बांधवांना बकरे ऑनलाईन खरेदी करावे लागण्याच्या सुचना आहेत. तसेच यावर्षी मुंबईतील सर्वात मोठा बाजार असलेला देवनार बकरे बाजारही बंद असणार आहे. देवनार येथे शेकडो व्यापारी राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश येथून बकरे घेऊन येत असतात. यावर्षी देवनार बाजार बंद करण्यात आला असला तरी, कल्याण येथील कोन आणि मिरारोड येथील फाऊंटन परिसरात बकरे विक्रेते त्यांच्या बक ऱ्यांची विक्री करत आहेत. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी त्याचे बकरे हे परराज्यातून मागविले होते. राज्य सरकारच्या सुचनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी वाढविली आहे. त्यामुळे  व्यापाऱ्यांनी मागविलेले बकरे किरकोळ विक्रेत्यांपर्यत पोहचण्यात अडचण निर्माण झाली आहे.

ठाणे पोलिसांनी परराज्यातून आलेले बकरे पुन्हा माघारी पाठविण्यास सुरूवात केली आहे. तर, सोमवारपासून तलासरी येथे शेकडो ट्रक पोलिसांनी रोखून ठेवल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या चार दिवसांवर बकरी ईद येऊन ठेपला असताना, ग्राहकांची मागणी आता वाढण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत. मात्र, मागणी पुरविण्यासाठी आणलेले बकरेच पोलिसांनी वेशीवर अडवून ठेवले आहे. एका ट्रकमध्ये सुमारे ६० ते ८० बकऱ्यांची वाहतूक होत असते. जर हे बकरे वेळत पोहचले नाहीत. तर, त्यांचा ट्रकमध्येच गुदमरून मृत्यू होईल. एका बकऱ्याची किंमत १० ते ३० हजार असल्याने बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल. तर, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेले बकरे हे व्यापाऱ्यांनी १० ते १५ दिवसांपूर्वी आणून ठेवले होते. मुंबई, भिवंडी, मुंब्रा शहरात मोठय़ा प्रमाणात मुस्लिम बांधव राहतात. त्यामुळे शिल्लक बकरे विकल्यानंतर बकऱ्यांचा ४० ते ५० टक्के तुटवडा भासण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहे.

ऑनलाईनही त्रासदायक

एखाद्या ग्राहकाला ऑनलाई बकरा खरेदी करायचा असल्यास त्याला व्यापारी बकऱ्याचे छायाचित्र पाठवितो. मात्र, बकरे हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तो खरेदी करणे अवघडच ठरते. बकऱ्याचे दात तसेच इतर अवयव तपासून बकऱ्याची किंमत ठरवली जाते. मात्र, छायाचित्र पाहून बकऱ्याची खरेदी करणे कठीण ठरत असल्याचे एका मुस्लिम बांधवाने सांगितले.

मटण तोडणाऱ्यांचा रोजगारही बुडाला

* बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधवांतर्फे  विकत घेतले जाणारे बकरे कापण्यासाठी शहरातील काही मटण विक्रेत्यांना बोलवण्यात येते.

* बकरी ईद हा विषेश सण असल्याने मटण तोडणाऱ्यांना या वेळी बक्षिस म्हणून ऐरवी पेक्षा जास्त रक्कम दिली जातो.

* त्यामुळे शहरातील सामान्य मटण तोडणारा व्यक्ती कुर्बानीच्या दिवशी २५ ते ३० हजार रुपये कमावतो. त्यामुळे श्रावण महिन्यात मटण विक्री बंद असली तरी त्यांना चांगले पैसे मिळतात.

* मात्र, यंदा करोनाचे सावट असल्यामुळे बकरी ईद साजरी केली जाईल की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे या मटण तोडणाऱ्यांचा रोजगारही बुडाला आहे.