श्री कला संस्कार व वेध अ‍ॅक्टिंग अकादमी यांच्या वतीने राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात पार पडली. विविध वयोगटात पार पडलेल्या या स्पर्धेत २५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील २० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. शालेय गटात गार्गी, स्वरांगी ठाकूर, तृष्णिका शिंदे, अवनी दाबके यांनी बाजी मारली तर खुल्या गटात भावना शिंदे या विजयी झाल्या. अभिनेते अनिल गवस, लेखक व दिग्दर्शक आनंद म्हसवेकर, दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर व कश्यप परुळेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले. या वेळी सुधीर जोगळेकर, माधव जोशी, गौरी करकरे, समीर जगे आदी मान्यवर उपस्थित होते.