भाईंदर : मीरा रोड येथील सिल्व्हर पार्क भागात मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या केबल तारांचा प्रश्न अधिक जटिल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य रस्त्यावरून ही केबल तार गेली असल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मीरा रोड येथील सिल्व्हर पार्क भागात बालाजी हॉटेल परिसर आहे. या भागात मोठय़ा प्रमाणात उंच उंच इमारती असल्यामुळे लोकसंख्यादेखील अधिक आहे. गेल्या काही वर्षत लोकसंख्ये प्रमाणे येथील केबल तारांमध्येदेखील वाढ झाली आहे. केबल तारांचे योग्य नियोजन न झाल्यामुळे संपूर्ण भागात तारांचे जाळे निर्माण झाले आहे. या तारांपैकी काही तारा चक्क रस्त्यावरून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा येत असून दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. केबल तारांचे रस्त्यावर अतिक्रमण झाले असतानादेखील प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नसल्यामुळे प्रवासीवर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील अनधिकृत परसलेल्या या केबल तारांवर कारवाई करण्याकरिता २०१९ रोजी जानेवारी महिन्यात महासभेत ठराव क्रमांक ११८ सहमत करण्यात आला होता, परंतु अद्याप त्यावर कारवाई न झाल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे. मुख्य बाब म्हणजे शहरातील अनेक राजकीय नेत्यांचा केबल व्यवसाय असल्यामुळे ना इलाजाने राजकीय दबावामुळे कारवाई केली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एखाद्या दिवशी कोणा प्रवाशाचा जीव गेल्यावर प्रशासन कारवाई करणार असे वाटते. - रेश्मा वानखडे, प्रवासी