जेवण, किराणा आणि निवाऱ्याची सुविधा पुरविण्याची तयारी सागर नरेकर, लोकसत्ता बदलापूर : टाळेबंदीत घरी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कामगार, मजुरांची उद्योजक आणि व्यावसायिकांनी मनधरणी सुरू केली आहे. यासाठी मजुरांच्या राहण्या-खाण्याची सोय करण्याची तयारी उद्योजकांनी केली आहे. काहींनी परराज्यातील मजुरांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना धीरही देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी मजुरांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ५० दिवसांपासून अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांनी मजुरांची व्यवस्था केली होती. त्यानंतरही मजुरांनी घरचा रस्ता धरल्याने या मजुरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवली, पनवेल, उरण आणि बदलापूरमध्ये बांधकाम व्यवसाय करणाऱ्या श्रीहरी समुहाच्या गजानन भाग्यवंत यांनी ४० मजुरांना रोखून धरले होते. आम्ही त्यांची जेवणाची, किराणा आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची काळजी घेत होतो. त्यानंतरही अनेक मजुर त्यांच्या घराकडे निघाले. सध्या १४ जण असून त्यांची सोय यापुढेही ठेवली जाईल, असे भाग्यवंत यांनी सांगितले. बांधकाम व्यवसायातील साहित्य, कच्चा माल नसल्याने मजुरांची इच्छा असूनही काम करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मजुरांना रोखण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून सर्वतोपरी मदत करत असल्याचे दिनेश पारेख यांनी सांगितले. उल्हासनगरचे पेशाने इंटेरियर डिझायनर असलेले संतोष महाडेश्वर आपल्याकडच्या मजुरांना रोखण्यासाठी शर्तीचे प्रय करत आहेत. आम्ही विविध कंत्राटे घेतली असून टाळेबंदी उठताच ती कामे सुरू होऊ शकतात. मजुरांना घरी जाण्याचे वेध लागले आहेत. मी त्यांच्या परराज्यातील कुटुंबियांशीही सातत्याने बोलत असून त्यांची काळजी घेत असल्याचे आणि त्यांना रोजगाराचे पैसे देण्याचेही आश्वासन देण्यात आहे. टाळेबंदीचाच धसका अनेक व्यावसायिकांनी कामगारांचे भाडे देऊ केले आहे. अनेकांच्या राहण्याची सोय उपलब्ध जागेत केली जाते आहे. मात्र, भविष्याचा विचार करता टाळेबंदी आणखी काही काळ लांबल्यास अशा मजुरांना किती काळ पोसायचे अशीही चिंता या उद्य्ोजकांना असून मजूर गेल्यास व्यवसायाचे काय, असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा आहे.