भाजीसंकट अंशत: दूर, आवक वाढली; पण अपुरी संप मागे घेण्याबाबत शेतकरी संघटनांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांना होणारा भाजीपाल्याचा पुरवठा अजूनही पूर्ववत झाला नसल्याचे चित्र आहे. संपाच्या पाश्र्वभूमीवर बाजार समितीच्या वाशी येथील घाऊक बाजारपेठा रविवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आल्या होत्या. शनिवार आणि रविवार असे दिवस या बाजारात भाजीपाल्याने भरलेल्या पाचशेहून अधिक गाडय़ा दाखल झाल्याने मुंबईकरांवरील भाजीसंकट काही प्रमाणात टळले असले तरी किरकोळीत अजूनही सर्वच भाज्या चढय़ा दराने विकल्या जात आहेत. मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. मुंबई महानगर क्षेत्राला दर दिवशी सुमारे १७०० टन इतक्या मोठय़ा प्रमाणावर भाजीपाल्याची आवश्यकता असते. यापैकी जवळपास ७५ टक्क्यांहून अधिक पुरवठा पुणे, नाशिक तसेच परराज्यातून होत असतो. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या शेतकरी संपानंतर मात्र हे गणित पूर्णपणे कोलमडले असून शनिवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतरही परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली नाही. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असहकाराची भूमिका कायम ठेवल्याने मुंबईस अजूनही म्हणाव्या त्या प्रमाणात भाज्यांचा पुरवठा सुरू झालेला नाही. शुक्रवारपर्यत गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांसारख्या परराज्यांतून मुंबई बाजारात भाज्यांचा पुरवठा केला जात होता. कर्जमाफीच्या घोषणेनंतर शनिवारी मात्र पुणे तसेच आसपासच्या भागांतून वाशी बाजारात भाज्यांचा पुरवठा काही प्रमाणात सुरू झाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी पत्रकारांना दिली. रविवारी सुट्टीच्या दिवशीही बाजारात २२७ वाहनांची आवक झाली आहे. तसेच मुंबई, ठाण्याच्या दिशेने भाज्यांनी भरलेली ३५० पेक्षा अधिक वाहने रवाना झाली आहेत, असे पानसरे यांनी स्पष्ट केले. एरवी हे प्रमाण ५०० ते ५५० वाहनांच्या घरात असते. त्यामुळे अजूनही मुंबई परिसरात भाज्यांची निम्मी आवकच सुरू आहे, असे घाऊक व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मुंबईत आवक कमीच मुंबई : शेतकरी संपामुळे भाज्यांची आवक रोडावल्याने ग्राहकांना रविवारीही चढय़ा भावाने भाजी खरेदी करावी लागली. गेल्या चार दिवसांपासून या मंडईत गुजरात, पालघर, डहाणू, पुणे, खेड या भागांतून भाज्यांची आवक होत आहे. मात्र, मुंबईतील नागरिकांच्या गरजेच्या तुलनेत हा पुरवठा कमी असल्याचे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. नवी मुंबईत ७०० ते ८०० ट्रक, तर भायखळ्यात दररोज १०० ते १२५ ट्रक भरून भाज्यांची आवक होते. मात्र गेल्या गुरुवारपासून ही आवक निम्म्यापर्यंत आली आहे. रविवारीही भायखळ्यात ७० ते ८० ट्रक भाज्या उपलब्ध होऊ शकल्या. दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मंडईतही रविवारी भाज्याच्या ७ ते ८ गाडय़ा दाखल झाल्या. हा माल अपुरा असल्याने या मंडईतही भाज्यांचे दर जास्त आहेत, असे या बाजारातील विक्रेता अमोल पाटील यांनी सांगितले. भाज्यांची आवकच कमी असल्यामुळे दर वाढवले आहेत. मात्र किरकोळ बाजारातील विक्रेते मात्र मनमानी भाव लावून विक्री करीत आहेत, असे भायखळा भाजी मंडई संघटनेचे किरण झोडगे यांनी सांगितले. * कर्जमाफीच्या घोषणेनंतर वाशी आणि कल्याणच्या घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली असली तरी किरकोळ विक्रेत्यांनी अजूनही चढय़ा दराने भाज्यांची विक्री सुरू ठेवली आहे. * मुंबई आणि परिसरास भाज्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होत असल्याचे कितीही दावे राज्य सरकारकडून केले जात असले तरी जवळपास सर्वच प्रमुख भाज्यांचे किरकोळीचे दर किलोमागे ६० रुपयांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. * उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे २५ रुपयांपेक्षा जादा दराने विकला जात असून टोमॅटो (६० रुपये), शिमला मिरची (८० ते १००), भेंडी (६० ते ७०), वांगी (६० ), कारली (६० ते ८०), मेथी जुडी (५० ) यांसारख्या भाज्याही चढय़ा दराने विकल्या जात आहेत. भाजी संपाआधीचे दर संपानंतरचे दर भेंडी ५० ते ६० रु. ६० ते ७० फ्लॉवर ३० रु. ७० कोबी ३० रु. ६० ते ७० शिमला मिरची ५० रु. ६० ते ८० वांगी ३० रु. ६० रु. कारली ४० रु. ६० ते ८० रु.