दिवा स्थानकातील थांब्याचा उपयोगापेक्षा उपद्रव जास्त एरवी सकाळी स्थानकात गाडी शिरू लागताच एखाद्या शर्यतीच्या मैदानात उभे राहिल्यासारखे गाडी पकडण्याच्या तयारीत सज्ज राहणाऱ्या दिवा स्थानकातील प्रवाशांना सोमवारी जलद गाडी पकडण्यासाठी त्याहून मोठी कवायत करावी लागली. दिव्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी या स्थानकात जलद उपनगरीय गाडय़ांना थांबा देण्यात आला असला तरी डोंबिवलीतूनच तुडुंब भरून येणाऱ्या या गाडीत चढायचे तरी कसे, असा प्रश्न दिव्यातील प्रवाशांना पडू लागला आहे. दर तासाने येणाऱ्या प्रत्येक ‘जलद’ गाडीत हीच गर्दी दिसल्यानंतर प्रवाशांनी अखेर नेहमीच्या धिम्या गाडय़ांकडे धाव घेतली. दिवा स्थानकातील प्रवाशांना दररोज गाडी पकडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांतून गेल्या वर्षी जानेवारीत या स्थानकातील प्रवाशांनी हिंसक आंदोलन केले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने दिवा स्थानकात प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध घोषणा केल्या होत्या. जलद गाडय़ांना या स्थानकात थांबा देण्याची घोषणा त्यापैकीच एक होती. परंतु प्रवासी संघटनांनी या घोषणेला त्या वेळीदेखील विरोध केला होता; परंतु तरीही रेल्वे प्रशासन व राजकीय पक्षांनी जलद गाडीचा मुद्दा रेटून पुढे आणला. रविवारी रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते दिव्यात जलद गाडीला थांबा सुरू करण्यात आला असला तरी, ही सुविधा प्रवाशांसाठी अधिक तापदायक असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. सोमवारी सकाळी ६.५७ ची जलद लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी ६.४० पासूनच स्थानकात येण्यास सुरुवात केली होती. प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्सुकता दिसून आली. परंतु रेल्वेने इंडिकेटरवर गाडीची वेळ न दर्शविल्याने नेमकी गाडी येणार की नाही, किती वाजता येणार, अशी धाकधूक अनेक प्रवाशांच्या मनात दिसून आली. ६.५० पासून स्थानकावर प्रवासी जमण्यास सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटांपूर्वी शुकशुकाट असणारे दिवा स्थानकातील फलाट क्रमांक ४ प्रवाशांनी भरून गेले. सकाळी ७ ची वेळ ही कमी गर्दीची असूनही वेळेचे गणित साधण्यासाठी प्रवासी लवकर स्थानकात आलेले पाहावयास मिळाले; परंतु कर्जतहून सुटलेली जलद लोकल दिवा स्थानकात शिरली तेव्हा या गाडीत चढणे तर दूरच, पण ‘फूटबोर्ड’वर पाय ठेवणेही कठीण असल्याचे पाहून प्रवाशांचा हिरमोड झाला. यानंतर सकाळच्या सुमारास आलेल्या अन्य गाडय़ांचीही हीच स्थिती होती. डोंबिवलीतूनच या जलद गाडय़ा भरून येत असल्याने दिव्यातील प्रवाशांना जलद गाडी थांबते, हे पाहण्याच्या पलीकडे कोणतेही समाधान मिळू शकले नाही. कल्याण लोकलला थांबा द्या! दिव्यातील प्रवासी गणेश कुबल डोंबिवलीला जाऊन जलद गाडी पकडत होते. दिवा स्थानकात जलद गाडी पकडता येते का याचा अंदाज घेण्यासाठी सोमवारी ते सकाळीच फलाटावर आले होते. कांचन जगदनकर या महिला प्रवासीही उत्सुकतेने फलाटावर उभ्या होत्या. ठाणे येथील आर.पी. मंगला हिंदी हायस्कूलचेही काही विद्यार्थीही जलद गाडीची वाट पाहताना दिसले. जलद गाडीमुळे आम्ही शाळेत लवकर पोहोचू. परीक्षेच्या काळात याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, असे आठवीत शिकणाऱ्या आयुष गौड, सूरज वर्मा यांनी सांगितले. पण या सर्वाचा भ्रमनिरास झाला. ठाण्यात उतरणारे प्रवासी डब्याचा दरवाजा अडवून धरणार असतील तर दिव्यातील प्रवाशांनी गाडीत शिरायचे कसे, असा प्रश्न विजय वरिष्ठ यांनी उपस्थित केला. कल्याण जलद लोकलला दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा. डोंबिवली स्थानकातूनही जलद लोकल सोडल्यास दिव्यावरील गर्दीचा ताण कमी होईल, अशी सूचना दिगंबर सावंत यांनी मांडली. दिव्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी डोंबिवली स्थानकातून धिम्या मार्गावरून जादा गाडय़ा सोडण्याची आवश्यकता होती; मात्र तसा निर्णय न घेता जलद गाडय़ांना थांबा देऊन रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्षात प्रवाशांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याचीच अधिक शक्यता आहे. - लता अरगडे, डोंबिवली रेल्वे प्रवासी संघटना सदस्या.