मुलाच्या गुन्हेगारीमुळे समाजात होणारी बदनामी सहन न झालेल्या पित्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार रविवारी दुपारी कल्याणमध्ये घडला.
शहाड परिसरात दरोडा आणि खूनप्रकरणी ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेने चौघांच्या टोळीला काही दिवसांपूर्वी जेरबंद केले होते. या टोळीचा म्होरक्या अल्पवयीन मुलगा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्याची ओळख जाहीर झाली नव्हती. मात्र, कल्याणमधील मिलिंदनगरमध्ये राहणाऱ्या या मुलाच्या वडिलांनी रविवारी बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणीतीही चिठ्ठी न सापडल्याने खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरोडा, खून प्रकरणात अटकेत असलेल्या आपल्या अल्पवयीन मुलाचे पुढील आयुष्य अंधाऱ्या कोठडीत जाणार, या काळजीने त्याचे वडील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यामुळे समाजात होणारी बदनामी त्यांना सहन होत नव्हती. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.