अंबरनाथमधील बुवापाडा येथे एकाच कुटुंबातील चार जण आगीत होरपळल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी झाशी येथून वास्तव्याला आलेल्या या कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांची दोन लहान मुले या आगीत गंभीररीत्या भाजले असून त्यांना उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी उपचारादरम्यान यातील वडील संजय चौधरी आणि मुलगा अनुज यांचा मृत्यू झाला असून पत्नी मांडवी आणि मुलगी राणी यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा येथील संघटन चौकात संजय चौधरी वास्तव्यासाठी आले होते. तर, तीन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी मांडवी (३५), मुलगा अनुज (२), मुलगी राणी (८) हेही राहण्यास आले होते. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चौधरी हे त्यांचे घरमालक ग्यानेंद्र झा यांच्याशी गप्पा मारून घरी आले होते. मात्र, साडेदहाच्या सुमारास चौधरींच्या घरातून अचानक धूर व आगीच्या ज्वाळा निघत असल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली व घराचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेताच दरवाजा तोडून चौधरी कुटुंबीयांना बाहेर काढत त्यांना उपाचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.