भिवंडीत आगीच्या घटनांची मालिका सुरू असून, पुन्हा एका कंपनीची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या डाईंग कंपनीत आगीचा भडका उडाला. यात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून, अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सरवली एम.आय.डी.सी.(भिवंडी कल्याण रोड, कोणगांव, भिवंडी) येथे असलेल्या कपिल रेयॉन कंपनीच्या कपड्याच्या गोडाऊनला २८ जानेवारी रोजी रात्री ०२:३६ वा. सुमारास आग लागली. त्यावेळी या कंपनीत असलेले ३० ते ४० कामगार वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. काही वेळातच कंपनीच्या दोन मजली इमारतीमध्ये सगळीकडे आग पसरली. या कंपनीत कच्च्या कपड्याचा आणि पक्क्या कपड्याचा मोठ्या प्रमाणावर साठा तसेच धागा होता, अशी माहिती समोर आली आहे. तसेच दोन्ही मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कंपनी जळून खाक झाली आहे. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून कल्याण, ठाणे आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली आहे. आगीनं रुद्रावतार घेतल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत आहेत.