मेजर गावंड यांचे कल्याणात प्रतिपादन 'देशाचे रक्षण करत आपले जीवन सार्थकी लावा', असे प्रतिपादन मेजर सुभाष गावंड यांनी शनिवारी येथील एका कार्यक्रमादरम्यान केले. आजच्या युगात सैन्य म्हणजे मृत्यू हे समीकरण बदलण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कल्याणातील सुभेदारवाडा कट्टय़ाच्या वतीने 'सैन्यदलातील संधी' या विषयावर मेजर गावंड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जगातील प्रत्येक व्यक्ती ज्या जीवनावश्यक गोष्टींसाठी मेहनत करते, त्या सर्वाबरोबर मानसन्मान प्राप्त करून देणारा पेशा म्हणजे संरक्षण दलातील नोकरी आहे, असे गावंड यांनी यावेळी सांगितले. देशरक्षणाचे कर्तव्य पूर्ण करताना आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद या सेवेत मिळतो. सैन्य दलात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी दशेतूनच सुरुवात करता येते असे ते म्हणाले. शालेय जीवनाच्या टप्प्यासहित त्यापुढील वाटचालीत विद्यार्थ्यांना ही सेवा कशी निवडता येईल, याची माहिती त्यांनी दिली. संरक्षण दलात जाण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक, मानसिक क्षमता निर्माण करण्यासाठी कोणती तयारी करावी लागते, या विषयीचे मार्गदर्शन गावंड यांनी तरुणांना केले. पालकांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.