१६ भट्टय़ांवर कारवाई; दुर्गंधी जाणवू नये म्हणून रसायनांचा वापर

ऋषिकेश मुळे, ठाणे</strong>

येऊर वन परिक्षेत्रातील गावठी दारूच्या भट्टय़ा उद्ध्वस्त करण्याची मोहीम वन विभागाने हाती घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत १६ भट्टय़ांवर कारवाई झाली असून, तीन वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. येऊर, नागला आणि चेणा या दुर्गम भागातील दारूभट्टय़ा शोधण्यासाठी विशेष पथक रात्रंदिवस तैनात असल्याचे येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले. वनरक्षकांना दारूचा वास येऊ नये म्हणून दारूत रसायन मिसळले जात असल्याचेही समोर आले आहे.

येऊरच्या जंगलात पर्यटकांचा राबता नेहमीच असतो. दाट जंगलाचा हा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतो. जंगलात गावठी दारूच्या मोठय़ा भट्टय़ा सुरू असल्याच्या तक्रारी काही वर्षांपासून वाढू लागल्या आहेत. मुंबईतील मालवणी भागात झालेल्या दारूकांडानंतरही या जंगलांमधील दारूभट्टय़ा उद्ध्वस्त करणे शक्य झाले नव्हते. मात्र, काही महिन्यांपासून या दारूभट्टय़ांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. येऊर पूर्व, सारजामोरी, पाचपाखाडी, कावेसर, ओवळा आणि चेणा पूर्व या भागांतील १६ भट्टय़ा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. नाले तसेच खडकाळ ठिकाणी या भट्टय़ा उभारण्यात आल्या होत्या. पाच दिवसांपूर्वीच येऊर पूर्व येथील दारूभट्टीवर वनविभागाने कारवाई केली. त्यात रसायनाने भरलेला एक ड्रम आणि एक बॉयलर उद्ध्वस्त करण्यात आला.

ठाणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत सहा हजार हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनपरिक्षेत्राबरोबरच तब्बल तीन महापालिकांच्या वनपरिक्षेत्रांचाही समावेश आहे. येऊर वनपरिक्षेत्र दोन हजार हेक्टर आहे. यात चेन्ना, नागला बंदर, मानपाडा, घोडबंदरचा समावेश होतो. ठाणे, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या तीन महापालिकांच्या हद्दीत येऊर वनपरिक्षेत्र विभागले गेले आहे. याचा गैरफायदा घेत जंगलात दारूच्या भट्टय़ा उभारल्या जात आहेत. त्यासाठी पर्यटक जाणार नाहीत, अशी ठिकाणे निवडली जातात. खडकाळ परिसर, नाले आणि दऱ्यांत ड्रममध्ये आवश्यक साधनसामग्री टाकून दारू तयार केली जाते. गस्तीवरील वनरक्षकांना गावठी दारूचा वास येऊन, दारूभट्टी पकडली जाऊ नये म्हणून वास दूर करणारे रसायनही दारूत मिसळले जात असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

ड्रममध्ये आवश्यक साहित्य टाकून फांद्या-पालापाचोळा रचून ड्रम-बॉयलर लपवले जातात. आठवडाभर कोणीही तिथे फिरकतही नाही. त्यानंतर दारूभट्टीचालक सावधपणे तिथे येतात. त्यामुळे त्यांना अटक करणे जिकिरीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उत्पादन शुल्क, पोलिसांची भूमिका महत्त्वाची

जंगलातील दारूभट्टय़ा उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी वनविभागावर असते, मात्र ज्या ठिकाणी या दारूची विक्री होते, त्यावर वचक ठेवणे ही राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे. पोलिसांकडूनही गावठी दारू  विकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

येऊर वनपरिक्षेत्रात रात्रंदिवस वनरक्षक तैनात असून दारू तयार करणाऱ्या भट्टय़ांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये वनकर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. येऊरच्या घनदाट जंगलात वनकर्मचारी भट्टय़ांचा शोध घेतात आणि त्या उद्ध्वस्त करतात.

– राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर, ठाणे.