वसईच्या बाजारपेठा रानमेव्याने फुलल्या आंबा, फणस या मोठय़ा फळांबरोबरच मे महिन्यात म्हणजेच वसंत ऋतूत रानटी फळेही बाजारपेठांमध्ये दृष्टीस पडतात. वसईच्या बाजारपेठेत तर जांभूळ, करवंद, राजन, जाम आदी रानमेवा दाखल झाला असून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वर्षांतून एकदाच आस्वाद घ्यायला मिळणारी ही फळे वसईच्या बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. खेडय़ापाडय़ातून आलेल्या महिला टोपल्यातून ही फळे विकायला बसलेल्या बाजारात दिसत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाडय़ात ही फळे खूप लाभदायक ठरतात. वेगवेगळ्या विकारांवर ती गुणकारी मानली जातात. सफरचंद, संत्री, आंबा, टरबूज, डाळींब, चिकू, केळी या फळांवर मोठय़ा प्रमाणात रासायनिक प्रक्रिया करण्यात येते, त्यामुळे ही फळे आरोग्याला धोकादायक ठरतात. परंतु रानमेवा नैसर्गिकरीत्या वाढलेली असतो आणि आरोग्यालाही लाभदायक ठरतो. करवंदे खुडणे कष्टाचे काम रानमेव्यात प्रसिद्ध असलेली करवंदे आदिवासी बांधवांना एप्रिल ते जून असा साधारण अडीच महिने रोजगार मिळवून देतात. करवंद खुडणे हे अत्यंत कष्टाचे काम असून उन्हाची पर्वा न करता जंगलातील झाडाझुडपांत जाऊन एकेक करवंद खुडून टोपली भरण्यासाठी आणि बाजारात आणण्यासाठी दोन दिवस जातात, असे करवंद विक्रेत्यांचे म्हणणे आहे. १० रुपये एक वाटा या दराने करवंदे, जांभूळ आणि राजन वसईच्या बाजारात विकली जातात. ५० ते ६० वाटे एका टोपलीत साधारणपणे असतात. ४५० ते ५०० रुपये विक्रेत्यांना दिवसभरात मिळतात.