सागर नरेकर

बदलापूर, मुरबाड तसेच आसपासच्या परिसरातील विपुल वनसंपदा हा निसर्गप्रेमींसाठी नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिला आहे. अलीकडे मात्र येथील जंगलांना तेथील प्राणी संपदेला सातत्याने नख लावण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी जात आहेत तर बिबटय़ासारखा प्राणी भुकेने व्याकूळ होऊन मृत्युमुखी पडत आहेत. राज्यभरात काही कोटी वृक्ष लागवडीची भाषा करणाऱ्या राज्यकर्त्यांना खरे तर हे शोभणारे नाही.

मे महिन्यात बौद्ध पौर्णिमेच्या रात्री लख्ख चंद्रप्रकाशात विविध जंगलांमध्ये प्राणिगणना पार पडली. या प्राणिगणनेनंतर पुन्हा एकदा सातत्याने कमी होणाऱ्या प्राणी संख्येवर लख्ख प्रकाश पडला. याच काळात बदलापूरजवळच्या जंगलात उपासमारीमुळे एका तीन वर्षांच्या बिबटय़ाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. गेल्याच आठवडय़ात माळशेजजवळच्या जंगलात दोन बिबटय़ांचा अन्नपाण्याविना मृत्यू झाल्याची आणखी एक बातमी पुढे आली आहे. याच दरम्यान मे महिन्यात खाजगी कामासाठी एका आदिवासीने जवळच्याच जंगल क्षेत्रातील जवळपास हजाराहून अधिक जुन्या-नव्या वृक्षांची कत्तल केली. एकामागोमाग येणाऱ्या या बातम्या अस्वस्थता वाढविणाऱ्या आहेत.

ठाण्यासारख्या शहरात बिल्डरांच्या प्रकल्पांसाठी साडेतीन हजार वृक्षांवर कु ऱ्हाड फिरवली जाणार आहे. या भागातील काही राजकारणी आणि अधिकाऱ्यांची यासाठी तयार झालेली साखळी सातत्याने चर्चेत आहेत. काही पर्यावरणप्रेमींनी सुरू केलेल्या लढय़ामुळे ही वृक्षतोड तूर्तास थांबली असली तरी बिल्डरांच्या प्रकल्पांना मोकळी वाट करून देण्यासाठी एका पायावर तयार असलेले काही अधिकारी ही स्थगिती कधी उठेल याची वाट पाहात आहेत. लोकसभा निवडणुकांचा निकाल काही तासांवर आला असताना मुंबई, ठाणेस्थित बडय़ा बिल्डरांसाठी मार्ग मोकळा करून देण्यासाठी घाईघाईत ३५०० हून अधिक वृक्षांवर कु ऱ्हाड चालविण्याचा निर्णय घेतला जातो हे खरे तर अस्वस्थ करणारे आहे. मात्र, स्वतला विकास पुरुष म्हणवून घेणारे हे अधिकारी जेव्हा अशा निर्णयासाठी लगबग करू लागतात तेव्हा त्यांचा खरा चेहरा सामान्यांपुढे आल्याशिवाय राहात नाही. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई अशा शहरांमधील निसर्गसंपदा बिल्डर आणि मोठय़ा विकास प्रकल्पांसाठी एकामागोमाग एक नष्ट केली जात आहे. निसर्गप्रेमींसाठी खरे तर हे अस्वस्थ करणारे आहे. ठाण्यासारख्या शहरात जे घडते आहे तेच बदलापूर, मुरबाडसारख्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या भागातही वेगाने पसरते आहे.

विविध शासकीय प्रकल्प, इमारती, रस्ते महामार्ग, रेल्वे मार्ग उभारताना मोठय़ा प्रमाणावर वनसंपदा नष्ट केली जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठी काही हेक्टर जागेवरील खारफुटी नष्ट केली जाणार आहे. या विकासांच्या कामात पर्यावरणाची पर्यायाने जंगलांची आणि वन्य जीवांची होणारी वाताहत सहसा समोर येत नाही. आज राज्यात अनेक मोठे महामार्ग उभारले जात आहेत. त्यासाठी सर्वात सोप्या पद्धतीने मिळणारी जमीन ही वन विभागाची असते. त्यामुळे सर्रासपणे वन विभागाच्या जमिनीवर नवनवीन वेगाने धावणारे रस्ते उभारले जात आहेत. या रस्त्यांमुळे जंगलाची आणि वन्य प्राण्यांचा रहदारीचा तुटणारा मार्ग मात्र कुणीही विचारात घेताना दिसत नाही.

 

जंगलातील प्राण्यांसाठी रहदारीसाठी मार्ग असावा, त्यासाठी ग्रीन कॉरिडोर अर्थात हरित मार्ग विकसित करण्याची गरज संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळातले पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यावर पुढे काहीही न झाल्याने हा विषय मागे पडला. गेल्या काही वर्षांत नागरी वस्तीत शिरणारे बिबटे, रस्ते अपघातात प्रवास करणाऱ्या प्राण्यांचा झालेला मृत्यू या हरित मार्गाची गरज दाखवून देतो. उल्हासनगरसारख्या लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या शहरात बिबटय़ा शिरणे हे याचेच उदाहरण आहे. वन्य प्राण्यांचे यशस्वी संR मण होण्यासाठी असे हरित पट्टे टिकवणे गरजेचे आहेत. बदलापूरजवळच्या बारवी जंगल क्षेत्रासाठी एका बाजूला तानसा, तुंगारेश्वर तर दुसऱ्या बाजूला भीमाशंकर, माथेरान, हाजीमलंग ते थेट मुंब्रा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असा हा हरित मार्ग टिकणे महत्त्वाचे आहे. प्राण्यांची वाहतूक या मार्गाने नैसर्गिकरीत्या झाल्यास प्रजोत्पादनात वाढ होऊ न प्राण्यांची संख्या वाढेल असे प्राणीप्रेमी सांगतात. अन्यथा एकाच जंगलात राहून वन्यप्राण्यांच्या प्रजोत्पादनाच्या प्रRि येला खीळ बसण्याची भीती असते. त्यासाठी प्राधान्याने अभ्यासपूर्वक विशेष मोहीम राबवण्याची गरज आहे.

हरित मार्गासह पक्ष्यांमार्फत होणारे वृक्षारोपणही टिकणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोटय़वधींचे वृक्षारोपणाचे आकडे देण्यापेक्षा टिकणाऱ्या आणि गरजेच्या झाडांचे रोपण महत्त्वाचे आहे. अनेकदा झाडांना पाने कमी असली तरी तिथल्या अन्नसाखळीतला तो महत्त्वाचा दुवा असतो. हा दुवा टिकवण्याची गरज आहे.  बदलापूर, माळशेजजवळ झालेल्या तीन बिबटय़ांचा मृत्यू हा शासकीय अनास्था आणि पर्यावरणाप्रति नसलेले गांभीर्य यामुळे झाल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. अन्नसाखळी तुटल्यानेच बिबटय़ांना आवश्यक खाद्य मिळू शकले नाही. हे खाद्य मिळण्यासाठी सुदृढ जंगलांची निर्मिती करण्यात आपण कमी पडल्याचेच यानिमित्ताने समोर आले आहे.

प्राणी प्रतिनिधी वाढण्याची आवश्यकता

तथाकथित विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी लोकांसाठी अनेक प्रकल्प आणतात आणि त्यातून विकासाचा मार्ग तयार करतात. मात्र जंगलाचा आणि त्यातील वन्यप्राणी-पक्ष्यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींप्रमाणे जंगल किंवा प्राणी प्रतिनिधी तयार होणे आवश्यक आहे.

विस्तारणारी शहरे धोकादायक

नेरळ, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ, नेवाळी, खोणी आणि कल्याणच्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर नागरी वसाहती उभ्या राहत आहेत. खाणी, उत्खनन यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. अंबरनाथपासून काही अंतरावर मुंबईची कचराभूमी उभी राहणार आहे. त्यामुळे घारीसारखे पक्षी येथे वाढतील. हे इतर पक्ष्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. हे नवे विस्तारीकरण अधिक धोकादायक वाटते आहे.