‘पर्यावरण दक्षता मंच’ आणि वनविभागात करार निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या ठाणे येथील ‘पर्यावरण दक्षता मंच’ने टिटवाळ्याजवळील रूंदे गावाजवळील वन विभागाची ५७ एकर जमीन वनराई फुलविण्यासाठी घेतली आहे. काळू नदीच्या काठावर असलेल्या या जमिनीत येत्या सात वर्षांत विविध प्रकारचे पशू, पक्षी, जलचर यांचा अधिवास वाढविणारी जंगली झाडे लावण्याचा निर्धार पर्यावरण मंचने केला आहे. वनराईतून पर्यावरण संवर्धनाबरोबर जैवविविधता फुलविणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट वन विभाग व पर्यावरण दक्षता मंच यांच्यामध्ये झालेल्या करारात आहे. जंगल फुलविण्याबरोबर या जागेत लहान लहान बंधारे बांधणे, डोंगराच्या घळीतील पाणी अडविणे ही जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. जमिनीची धूप होऊ नये म्हणून मृदुसंधारणाची कामे होणार आहेत. या भागात पाणी साठा होणार असल्याने विविध प्रकारच्या पक्ष्यांना अधिवास आणि जंगली प्राण्यांना निवारा मिळणार आहे. विलायती झाडांबरोबर स्थानिक साग, खैर, आंबा, चिंच, मोह, पळस, ऐन, वड, शिरीष, गिरीपुष्प अशा अनेक प्रकारच्या झाडांच्या लागवडींना सर्वाधिक प्राधान्य असणार आहे. या जंगलाच्या संरक्षणासाठी ५७ एकरच्या परीघ क्षेत्रात चोहोबाजूने खंदक (चर) खोदण्यात येणार आहेत. या चऱ्यांच्या ढिगांवर सागरगोटा, निवडुंगसारखी काटेरी नैसर्गिक संरक्षित जाळे करण्यात येणार आहे. वणवा, मोकाट जनावरांपासून वनराई, नवीन लागवडीचे संवर्धन व्हावे, हा यामागील उद्देश आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षेची व्यवस्था असणार आहे. लोकसहभागाचा वनराईतील लागवडीला हातभार लागावा म्हणून ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांशी संपर्क करून त्यांनी पावसाळ्यानंतर रूंदे येथे होणाऱ्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, म्हणून प्रयत्न होत असून समाजाच्या प्रत्येक घटकाला पर्यावरणाचे महत्त्व कळावे, हा या उपक्रमामागील हेतू आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी रूंदे गावाजवळील काळू नदीच्या काठावरील वन विभागाची सुमारे ५० एकर जमीन कल्याण जनता सहकारी बँक व ठाणे भारत सहकारी बँकेच्या सहकार्याने वनराईने फुलली आहे. त्याच वनराईच्या समोर पर्यावरण दक्षता मंचला १९.१९ हेक्टर (५७ एकर) जमीन वनराई फुलविण्यासाठी मिळाली आहे. वन विभाग आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्यामध्ये हे जंगल फुलविण्याबाबत करार झाला आहे. येत्या सात वर्षांत पर्यावरण दक्षता मंचने स्वबळ, लोकसहभागातून ही वनराई फुलविण्याचा निर्णय घेतला आहे. -संगीता जोशी, समन्वयक, पर्यावरण दक्षता मंच.