गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे परिसरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये चार लहान मुले बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये तीन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. शहरातील साखळी चोरीच्या घटनांमध्ये खंड पडलेला नसतानाच अशा प्रकारचेही गुन्हे वाढू लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
 पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी परिसरातील लखन वाकोडे आणि युवराज बोरे ही दोन मुले स्वच्छतागृहात जातो म्हणून घरातून बाहेर पडली, मात्र दोन दिवस झाले तरी घरी परतली नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
    वागळे इस्टेट परिसरातील संतोषीमाता चाळीत राहणारे रामबहादूर चौहान यांची मुलगी पूजा हिचेही अपहरण झाल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पडवळनगर परिसरातील सुनील विश्वकर्मा यांचा १५ वर्षांचा मुलगा बुधवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.