दातिवली भागात राहणाऱ्या एका महिलेचे १६ वर्षांपूर्वी उपनगरीय रेल्वेत प्रवासा दरम्यान चोरीला गेलेले सोन्याचे पान ठाणे रेल्वे पोलिसांनी पुन्हा महिलेस सुपूर्द केले. विशेष म्हणजे, ही महिला दातिवली भाग सोडून इतर ठिकाणी राहत होती. मात्र, पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतला. दातिवली भागात भाडय़ाने राहणाऱ्या रेश्मा अमृते (४१) यांचे २००५ मध्ये उपनगरीय रेल्वे प्रवासात ५.८० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या पान चोरीला गेले होते. या घटनेनंतर रेश्मा यांनी तात्काळ ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्या आरोपीकडून रेश्मा यांचे चोरीस गेलेले सोन्याचे पान जप्त केले होते. हे पान रेश्मा यांना देण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत घरी गेले. रेश्मा या त्यांचे दातिवली येथील घर सोडून दुसरीकडे गेल्या होत्या. पाच वर्षांपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागला. त्यानंतर सोन्याचे पान रेश्मा यांना परत करणे गरजेचे होते. परंतु त्यांचा कोणताही पत्ता पोलिसांना मिळात नव्हता. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी हे सोन्याचे पान पोलिसांकडेच जमा करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने पुन्हा पोलिसांना त्यांच्या घरावर नोटीस चिटकवून येण्याच्या सूचना केल्या. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी परिसरातील ग्रामपंचायत, रेल्वे स्थानके याठिकाणी नोटीस चिटकविल्या. रेश्मा यांच्या परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांनी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे येथे चिटकवलेली नोटीस वाचली आणि रेश्मा यांना संपर्क साधला. त्यानंतर ३० डिसेंबरला रेश्मा या ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात आल्या. पोलिसांनी खात्री करून त्यांच्याकडे सोन्याचे पान सुपूर्द केले.