ठाण्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘इंडस्ट्रिअल इंजिनिअरींग इन्स्टिटय़ूट’चा सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळा नुकताच सीकेपी सभागृहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या निरंतर विद्या शाखेचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे, आर. ई. आय.च्या शीला चिटणीस उपस्थित होते, तर ५० वर्ष संस्थेशी संबंध असलेल्या विविध संस्था, व्यक्तींचा हृद्य सत्कार करण्यात आला. ठाण्यात १९६५ मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी इंडस्ट्रीयल इंजिनीअरिंग इन्स्टिटय़ूटची स्थापना सुरेश सुळे यांनी केली. ठाण्यातील चेंदणी परिसरातील दत्त मंदिराजवळ छोटय़ा खोलीमध्ये सुरू झालेल्या संस्थेने तंत्रशिक्षणाचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. काळानुरूप संस्थेत बदल होत गेले. विविध नवे अभ्यासक्रम संस्थेने सुरू केले. सुरेश सुळे यांच्या बरोबरीने श्रीराम केळकर यांनी संस्थेचा पाया भक्कम केला तर पुढे शशांक सुळे यांनी या विद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये अमुलाग्र बदल केले. संस्थेचा हा कालपट श्रीराम केळकर यांनी उपस्थितांसमोर मांडला. संस्थेच्या पन्नास वर्षांमध्ये ५० हून अधिक अभ्यासक्रमांना एक लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. संस्थेत पूर्ण वेळ व अर्धवेळ शंभरपेक्षा अधिक शिक्षक शिकवतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सुरेश सुळे, संजय सुळे, शशांक सुळे उपस्थित होते.