ठाणे : सरकारविरोधात बोलणाऱ्यांना ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ची भीती दाखवून त्यांचा आवाज दाबला जात असून त्यासाठी सरकार मनी आणि मसल पॉवरचा वापर करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

ठाण्यातील संघर्ष संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांतील पूरग्रस्तांना मदत म्हणून गृहोपयोगी वस्तू पाठविण्यात आल्या. त्यानिमित्त ठाण्यात आलेल्या खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

निवडणूक जवळ आल्यामुळेच सरकार चौकशांचे फार्स करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. असे प्रकार पहिल्यांदाच घडत आहेत. आपल्या व्यवस्थेसाठी हे धोकादायक आहे, असे सुळे यांनी सांगितले.

निवडणुकीचा प्रचार करण्यातच हे सरकार वेळ घालवीत असल्याचे चित्र सांगली आणि कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीत दिसले. पूरस्थिती असतानाही मंत्री सेल्फी काढताना आणि प्रचार करताना दिसले. पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही चार ते पाच दिवस लागले. आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी हे सरकार घातक आहे, असेही त्यांनी सांगितले.

ठाकरे कुटुंबावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यांच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे राज यांच्या कुटुंबाबरोबर आहेत, याबाबत आश्चर्य वाटत नाही तर आनंद वाटतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.