ठाण्यात चांगलाच मुसळधार पाऊस कोसळतो आहे. शुक्रवार रात्रीपासूनच ठाण्यात चांगलाच पाऊस पडतो आहे. आज सकाळीही सरी कोसळत आहेत. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. रस्ते आणि रेल्वे रुळांवरही पाणी साठलं आहे. ठाण्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. दरम्यान संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी पालिका हद्दीमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन, सकाळी ८.३० वाजता

वेधशाळेने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण परिसरात पुढील चार तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे दुपारी ३ वाजून ३५ मिनीटांनी ४.५८ मीटरची भरती असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व अधिका-यांनी अलर्ट राहून स्थानिक नगरसेवकांच्या समन्वयाने नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने दूर करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी दिले आहेत. शहरात आज सकाळपासून जवळपास १०० मिमि पावसाची नोंद झाली असून ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्या ठिकाणी तात्काळ आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिका-यांना दिल्या असून त्यानुसार महापालिकेचे अधिकारी त्या त्या परिसरात कार्यरत आहेत.