पाणी ओसरले तरी वसई-विरारमधील समस्या कायम आठवडाभर पाण्यात असलेल्या वसई-विरार शहरातील पाणी ओसरले असले तरी शहरातील समस्या कायम आहे. शहरात सर्वत्र चिखल, खड्डे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना त्रास होत आहे. कुजलेल्या कचऱ्यामुळे बहुतेक ठिकाणी दरुगधी पसरली असून त्याचाही नागरिकांना त्रास होत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई-विरार शहर जलमय झाले होते. आठवडय़ाभरानंतर पाणी ओसरले असले तरी आता पुराच्या खाणाखुणा शहरात दिसत आहेत. जागोजागी चिखल साचलेला असून प्रमुख रस्त्यांवरही खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. नाल्यातील गाळ आणि कचरा रस्त्यावर वाहून आलेला आहे. महापालिकेतर्फे कचरा उचलला जात असला तरी गाळ आणि चिखल जागोजागी दिसून येत आहे. नालासोपारा पश्चिमेच्या बस आगारात तसेच वसई पश्चिमेच्या नवघर बस आगारात चिखल आणि पाणी साचलेले आहे. त्यातून चालताना नागरिकांना मोठय़ा त्रासाचा सामना करावा लागत आहे. नालासोपारा आणि तुळिंज पोलीस ठाण्यात पाणी शिरले होते, त्या परिसरात घाण पसरलेली आहे. नालासोपारा पोलीस ठाण्याचे दप्तरच पाण्यात भिजले असून संपूर्ण परिसरात दरुगधी पसरलेली आहे. नालासोपारा पूर्वेकडील धानीव बाग, सेंट्रल पार्क, नगीनदास पाडा, रेहमत नगर येथील पाणी ओसरल्यानंतर आता चिखल साचलेला आहे. आत्मवल्लभ संकुल परिसरातील रस्त्यापासून पसरलेल्या चिखलामुळे दलदल तयार झाल्यासारखी दिसून येत आहे. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला रेल्वे स्थानकानजीकचा परिसर बजबजपुरी झाला आहे. चिखल, रिक्षांची गर्दी, प्रवाशांची गर्दी यामुळे तेथून ये-जा करणेही जिकिरीचे झालेले आहे. सर्वत्र घाण, दरुगधी आढळून येत आहे. वसई पश्चिमेच्या डीजी नगरमधील पाणी गेले असले तरी पुराचा चिखल साचलेला आहे. सनसिटी गास रस्ता, शंभर फुटी रोड तसेच खाडीलगतच्या रस्त्यांवर पुराचा गाळ आणि कचरा जमा झालेला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तीन पाळ्यांमध्ये कचरा उचलण्यात येत आहे. मात्र या भागातील रस्त्यांवर कचरा दिसून येत आहे. समुद्रकिनाऱ्यांवरही कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे.